मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी कांद्याची एकूण ४५ हजार १९८ क्विंटल आवक झाली आहे. दिवाळीनंतर कांद्याच्या दरांमध्ये आणि आवक-निवकीत चढ-उतार कायम असून, काही ठिकाणी दर समाधानकारक असले तरी काही बाजारपेठांमध्ये घसरण दिसत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याची स्थिती काहीशी अनिश्चित आहे.
advertisement
लासलगाव या आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारात आज उन्हाळी कांद्याला कमीतकमी ४५१ रुपये आणि सरासरी १,१७० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याचे दर थोडेसे सुधारले असून, कमीतकमी ६०० रुपये आणि सरासरी १,२५० रुपये दर नोंदवला गेला आहे.
अहिल्यानगर बाजारात कांद्याची चांगली आवक झाली असून, उन्हाळी कांद्याला कमीतकमी ५०० रुपये आणि सरासरी १,३०० रुपये दर मिळाला. स्थानिक कांद्याला ८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. भुसावळ बाजारात दर ५०० ते ८०० रुपयांदरम्यान राहिले.
सोलापूर बाजारात लाल कांद्याला आज १०० ते १,२५० रुपये दरम्यान भाव मिळाला, तर पांढऱ्या कांद्याने चांगली झेप घेत सरासरी १,८०० रुपये दर गाठला. नागपूर बाजारात लाल कांद्याचे दर १,००० ते १,३२५ रुपयांपर्यंत राहिले, तर पांढऱ्या कांद्याला सरासरी १,५५० रुपये दर मिळाला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा बाजारांमध्ये दर काहीसे स्थिर राहिल्याचे अहवालातून दिसून आले.
अमरावती फळ व भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक कांद्याला सरासरी १,२५० रुपये, पुण्यातील पिंपरी बाजारात १,००० रुपये आणि मंगळवेढा बाजारात तब्बल १,९५० रुपये दर मिळाला. सांगली बाजारात लोकल कांद्याला सरासरी १,३०० रुपये आणि सातारा बाजारात लाल कांद्याला १,५०० रुपये सरासरी दर मिळाला.
नाशिक विभागात दरांमध्ये थोडीशी घसरण दिसली असली तरी व्यापाऱ्यांनी पुढील आठवड्यापर्यंत दर पुन्हा वाढतील, असा अंदाज वर्तवला आहे. कारण सध्या उन्हाळी कांद्याची काढणी शेवटच्या टप्प्यात असून, नवीन कांद्याच्या आवकसाठी अजून काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी स्थिर राहिल्यास दर वाढण्याची शक्यता आहे.
प्रमुख बाजारभाव (२५ ऑक्टोबर २०२५): ( दर प्रती क्विंटलमध्ये)
अहिल्यानगर: उन्हाळी कांदा – सरासरी दर १,३०० रु
नाशिक: उन्हाळी कांदा – सरासरी दर १,१०० रु
सांगली: लोकल कांदा – सरासरी दर १,३०० रु
सातारा: लाल कांदा – सरासरी दर १,५०० रु
सोलापूर: लाल कांदा - १,२५०, पांढरा कांदा १,८०० रु
दरम्यान, राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याची विक्री सुरळीत सुरू असून, येत्या काही दिवसांत दरात वाढ होण्याची शक्यता व्यापार व कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील हालचालीवर लक्ष ठेवून विक्रीचा योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला जात आहे.
