Mumbai Fire: कुठं फटाके, कुठं शॉर्ट सर्किट... मुंबईत ऐन दिवाळीत अग्नितांडव, सहा दिवसांत 25 घटना
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Fire: मुंबई अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून अनेक ठिकाणी मोठी जीवितहानी टाळली, परंतु काही ठिकाणी दुर्दैव टाळता आले नाही.
मुंबई : दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके आणि रंगीबेरंगी लाइटिंग आलीच. घराघरात झगमगणाऱ्या रोषणाईमुळे संपूर्ण शहर उजळून निघालं असलं, तरी याच रोषणाईच्या ठिणग्यांनी अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडवल्या. गेल्या सहा दिवसांत मुंबईत शॉर्टसर्किट, फटाके आणि विजेच्या उपकरणांमधील बिघाडांमुळे तब्बल 25 पेक्षा अधिक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मुंबई अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून अनेक ठिकाणी मोठी जीवितहानी टाळली, परंतु काही ठिकाणी दुर्दैव टाळता आले नाही. दिवाळीचा आनंद साजरा होत असतानाच, या घटनांनी शहरवासीयांना हादरवून सोडलं आहे.
पठाणवाडीपासून कफ परेडपर्यंत आगींचा सुळसुळाट
1) 15 ते 23 ऑक्टोबर या अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांत आग लागल्याच्या 25 हून अधिक तक्रारी अग्निशमन विभागाला प्राप्त झाल्या. फटाके, शॉर्टसर्किट आणि विजेच्या उपकरणांमधील बिघाड ही प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
2) मालाड (पूर्व) पठाणवाडी परिसरात, ऑक्टोबर महिन्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 15 ते 20 गाळे पूर्णपणे जळून खाक झाले. दुकाने आणि गाळ्यांमधील सर्व वस्तू आगीत नष्ट झाल्या.
3) महाकाली नगर, अंधेरी येथे 19 ऑक्टोबर रोजी मोटर रूममध्ये लागलेल्या आगीने सात ते आठ झोपड्यांचा राखेचा ढिगारा झाला. अग्निशमन दलाने तातडीने पथकं पाठवून आग नियंत्रणात आणली.
advertisement
4) कफ परेड (मच्छीमार नगर) येथे 20 ऑक्टोबर रोजी पहाटे आग लागली. या दुर्घटनेत 15 वर्षीय यश विठ्ठल खोत या मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
5) मालाड (पश्चिम) येथील भूमी क्लासिक इमारतीत 22 ऑक्टोबर रोजी सकाळी आग लागून फर्निचर, एसी, आणि घरगुती साहित्य जळून गेले. एका अग्निशमन जवानालाही किरकोळ दुखापत झाली.
advertisement
6) बोरिवलीतील गोराई नालंदा सीएबएस परिसरात, 22 ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत पूजा पारख या 37 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन पुरुषांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढलं.
7) जोगेश्वरी (पश्चिम) येथील जोएल्स बिझनेस सेंटर या 13 मजली इमारतीत 23 ऑक्टोबर रोजी आग लागल्याने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. पहिल्या मजल्यावर लागलेली आग तातडीच्या कारवाईनंतर नियंत्रणात आणली गेली. शेकडो कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
advertisement
अग्निशमन दलाची सतर्कता आणि नागरिकांना इशारा
view commentsमुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, 15 ते 23 ऑक्टोबरदरम्यान केवळ 6 दिवसांत 25 हून अधिक ठिकाणी आगीचे कॉल प्राप्त झाले. बहुतांश ठिकाणी शॉर्टसर्किट, दिव्यांच्या वायरिंगमधील दोष आणि फटाक्यांच्या ठिणग्या हीच कारणं आढळली आहेत. दलाने सणासुदीच्या काळात नागरिकांना लाइटिंग करताना काळजी घेण्याचं, फटाके सुरक्षित ठिकाणी फोडण्याचं आणि विजेच्या उपकरणांची योग्य तपासणी करण्याचं आवाहन केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 9:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire: कुठं फटाके, कुठं शॉर्ट सर्किट... मुंबईत ऐन दिवाळीत अग्नितांडव, सहा दिवसांत 25 घटना


