सोलापूर – ऐन उन्हाळ्यात बळीराजावर दुहेरी संकट कोसळलंय. एकीकडे अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून दुसरीकडे हातातोंडाशी आलेली पिके कवडीमोलानं विकावी लागत आहेत. सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यातील पैशाचं पीक म्हणून खरबुजाची शेती केली जाते. पंरतु, सध्या खरबूज उत्पादकांचा खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
advertisement
मोहोळ तालुक्यातील कोरवलीचे शेतकरी गंगाधर काशिनाथ म्हमाणे यांनी पाच एकरात खरबूज लागवड केली होती. पण बाजारात सध्या खरबूजला 6 ते 8 किलो दर मिळत आहे. त्यामुळे घातलेला खर्चही निघणार नाही. तर उलट 2 ते अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शेती कशी करायची? असा उद्विग्न सवाल म्हमाणे करत आहेत.
खर्चापेक्षा उत्पन्न कमी
फेब्रुवारी महिन्यात म्हमाणे यांनी कुंदन जातीचे खरबूज लावले. ही लागवड करत असताना दोन्ही ओळमधील अंतर पाच फूट ठेवलं होतं. पाच एकर क्षेत्रात जवळपास 30 हजार बियांची लागवड केली होती. खरबूज लागवड करत असताना मल्चिंग, बियाणे, भेसळ डोस आदी मिळून एकरी खर्च 70 ते 80 हजार रुपये पर्यंत आला. 5 एकासाठी जवळपास 4 लाख रुपये खर्च केले. परंतु, सध्या बाजारात खरबुजाला मिळणारा दर पाहता खर्च केलेली रक्कम सुद्धा निघणार नसल्याची स्थिती आहे.
गतवर्षी खरबूजला 22 ते 25 रुपये किलो दर मिळत होता. याही वर्षी दर चांगला मिळेल या अपेक्षेने खरबूज लागवड केली होती. परंतु, सध्याच्या भावानं खरबूज विकल्यास 2 लाखांचं सुद्धा उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळं यंदा मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. उच्च शिक्षण घेऊन शेतीचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय फसल्याचं अशा नुकसानीमुळे वाटतंय, असं गंगाधर म्हमाणे सांगतात.