२१ व्या वर्षी घेतला धाडसी निर्णय
विजयराघवन यांचा प्रवास अत्यंत साध्या सुरुवातीपासून सुरू झाला. १९९५ साली, अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी उद्योजकतेचा धाडसी निर्णय घेतला. कापड अभियांत्रिकीचा डिप्लोमा घेतल्यानंतर, जुन्या मशिन्स आणि मर्यादित भांडवलाच्या जोरावर त्यांनी तिरुपूरमध्ये एक छोटे विणकाम युनिट सुरू केले. राजपालयम या छोट्या शहरात शिक्षिका आई आणि बँक व्यवस्थापक वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या विजयराघवन यांना लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यांनी आपल्या कंपनीला पालकांच्या नावावरून ‘बीएस अॅपेरल’ असे नाव दिले, जे पुढे ‘बीव्हीके एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
३,००० नगांवरून थेट ४ लाख नगांपर्यंत पोहोचली
सुरुवातीच्या काळात केवळ कापसाच्या धाग्यांपासून कापड तयार करून ते इतर उत्पादकांना पुरवले जात होते. मात्र, बाजाराची गरज ओळखून त्यांनी टी-शर्ट आणि ट्रॅक पँट्सचे उत्पादन सुरू केले. आकर्षक डिझाइन्स, दर्जेदार कापड आणि वेळेवर पुरवठा या त्रिसूत्रीमुळे त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढू लागला. निर्यात बाजारातही त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आणि मासिक उत्पादन क्षमता ३,००० नगांवरून थेट ४ लाख नगांपर्यंत पोहोचली.
व्हॅन ह्यूसेन, प्यूमा, रेमंड आणि बॉस कंपन्यांसाठी काम
आज विजयराघवन यांची कंपनी व्हॅन ह्यूसेन, प्यूमा, रेमंड आणि बॉस यांसारख्या नामांकित जागतिक ब्रँडसाठी कपडे तयार करते. त्यांच्या अत्याधुनिक कारखान्यात ४५ विणकाम यंत्रे, ८५० शिलाई मशिन्स असून सुमारे १,६०० कर्मचारी कार्यरत आहेत. गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेवर असलेला त्यांचा भरच त्यांच्या यशाचे मुख्य गमक मानले जाते. कापसासोबतच बांबू-कापूस, मेरिनो लोकर आणि टेन्सेल यांसारख्या आधुनिक मिश्रणांचे कापड तयार करून त्यांनी उत्पादनात वैविध्य आणले आहे.
बांबूच्या तंतूपासून बनवली इनरवेअर
२०१० साली त्यांनी पत्नी लावण्य यांच्या नावावर ‘लावोस’ हा इनरवेअर ब्रँड सुरू केला. बांबूच्या तंतूपासून बनवलेली ही उत्पादने मऊ, घाम शोषणारी, तापमान नियंत्रित करणारी आणि दुर्गंधी प्रतिरोधक आहेत. ईशान्य भारतातून मिळणाऱ्या बांबू फायबरचा वापर करून तयार केलेली ही इनरवेअर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. दररोज १,५०० हून अधिक तुकड्यांची विक्री होत असल्याचे सांगितले जाते.
उद्योगातील यशासोबतच विजयराघवन यांनी पर्यावरण आणि समाजाप्रतीही आपली बांधिलकी जपली आहे. त्यांचा कारखाना पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जेवर चालतो, तसेच अतिरिक्त वीज राज्य वीज मंडळाला विकली जाते. सांडपाण्यापैकी ९५ टक्के पाणी पुनर्वापरात आणले जाते. भविष्यात राजपालयममध्ये केवळ महिलांसाठी रोजगार देणारे युनिट सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. अडचणी, आर्थिक चढ-उतार आणि स्पर्धा असूनही हार न मानता त्यांनी दाखवलेला हा प्रवास आज अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
