जिल्ह्यातील स्वस्त धान्य योजनेचा आढावा
लातूर जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेंतर्गत एकूण 3.98 लाख लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्य वितरित केले जाते. प्रत्येक लाभार्थ्यास दरमहा 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिला जातो.18.22 लाख लोकसंख्येला या योजनेचा फायदा मिळतो.
आधार सीडिंगमध्ये निलंगा तालुका आघाडीवर
जिल्ह्यात आधार सीडिंग प्रक्रियेचे काम वेगाने सुरू असून, निलंगा तालुक्यात 100% आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. तालुक्यातील 2.41 लाख लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे.मात्र,जळकोट आणि देवणी तालुके अद्याप पिछाडीवर आहेत.
advertisement
लाभार्थ्यांसाठी सुविधा आणि अंतिम मुदत
लातूर जिल्ह्यात 1,351 स्वस्त धान्य दुकाने आहेत, जिथे आधार सीडिंग आणि ई-केवायसी करण्याची सोय उपलब्ध आहे.सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 28 फेब्रुवारीपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांनी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. जर त्या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर धान्य पुरवठा थांबवण्यात येईल.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा
जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी सांगितले की, "शासन आदेशानुसार स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आधार सीडिंग आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा थांबवला जाईल. वारंवार सूचना देऊनही 22,050 लाभार्थ्यांनी अद्याप आधार लिंक केलेले नाही,त्यामुळे कठोर पावले उचलण्यात येतील."
दरम्यान, जे लाभार्थी अद्याप आधार लिंकिंग किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा, मार्च महिन्यापासून त्यांना धान्य मिळणे कठीण होईल.