Mumbai Local: लोकलच्या गर्दीवर कायमचा उपाय! मध्य रेल्वेचा गेमचेंजर प्लॅन, काम सुरू!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता लोकलचा प्रवास अधिक आरामदायक होणार असून मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मायानगरी मुंबई हे देशातील व्यस्त शहर. दररोज लाखो प्रवासी येथील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना वर्षाचे बारा महिने भेडसावणारी एकच समस्या कायम आहे, ती म्हणजे लोकलमधील गर्दी. दररोजचा हा त्रास प्रवाशांच्या सहनशक्तीपलीकडे गेला असताना मध्य रेल्वेने दीर्घकालीन उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील कोंडी कमी करण्यासाठी 12 डब्यांच्या गाड्यांऐवजी 15 डब्यांच्या लोकल चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे गर्दीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्याची चिन्हे आहेत.
15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढणार
सध्या मध्य रेल्वेवर केवळ 22 फेऱ्या 15 डब्यांच्या लोकलद्वारे चालवल्या जातात. हा आकडा मुंबईसारख्या महानगरासाठी अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता हा आकडा थेट 240 फेऱ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारामुळे प्रवाशांना अधिक जागा मिळेल, गाड्यांतील ताण कमी होईल आणि गर्दीतून दररोज होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.
advertisement
प्रशासनाचे म्हणणे आहे की, 15 डब्यांच्या गाड्यांची वारंवारता वाढवता आली तर उपनगरी रेल्वेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि गर्दीच्या वेळेतही प्रवाशांना प्रवास करणे तुलनेने सोयीचे होईल. विशेषत: सीएसएमटी ते कर्जत, कसारा या मार्गांवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या भागात 15 डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे.
advertisement
वाढीव क्षमतेमुळे मोठा दिलासा
15 डब्यांच्या लोकलची सर्वात मोठी सोय म्हणजे त्यांची प्रवासी क्षमता. एका 12 डबा लोकलच्या तुलनेत 15 डबा लोकलमध्ये 25 टक्के अधिक, म्हणजेच 600 ते 800 प्रवासी जास्त सामावू शकतात. हे प्रमाण एका फेरीतच मोठा फरक घडवते.
पायाभूत सुविधांतील अडथळ्यांवर काम वेगाने
15 डब्यांच्या लोकलचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता, मात्र कमी लांबीचे फलाट, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी आणि पिटलाइन व स्टॅबलिंग लाइनची अपुरी क्षमता या अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडला होता. आता मात्र मध्य रेल्वेने या सर्व अडचणींवर काम सुरू केले असून 34 स्थानकांवरील फलाट विस्तार सुरू आहे. यातील 27 स्थानकांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.
advertisement
या स्थानकांवर काम सुरू
शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली, पळसदरी, मुंब्रा, कोपर, कळवा तसेच इतर काही स्थानकांवरही डब्यांच्या लांबीसाठी आवश्यक तो विस्तार केला जात आहे. फलाटांची लांबी 15 डब्यांसाठी साधारण 350 मीटर असावी लागते, त्यामुळे या कामाचा वेग महत्त्वाचा आहे.
नव्या रेकसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध
15 डब्यांच्या लोकल रेकला उभे करण्यासाठीही रेल्वेने तयारी सुरू केली आहे. सध्या 15 डब्यांचे दोन रेक सीएसएमटी आणि कल्याण येथे उभे राहतात. वाढत्या मागणीमुळे आता या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त जागा तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच वांगणी आणि भिवपुरी स्थानकांवर 15 डब्यांच्या लोकलसाठी स्वतंत्र रेक उभे करता येतील अशी नवीन सुविधा उभारली जात आहे.
advertisement
टप्प्याटप्प्याने प्रकल्पाची अंमलबजावणी
view commentsरेल्वेने हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवण्याचा आराखडा आखला आहे. पहिल्या टप्प्यात, विद्यमान 12 डब्यांच्या लोकल रेकचे 15 डब्यांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, आणखी दहा रेक 15 डब्यांत रूपांतरित करून सेवेत आणले जातील. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकूण 20 लोकलगाड्यांद्वारे 240 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांचा लोकल प्रवास तुलनेने अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: लोकलच्या गर्दीवर कायमचा उपाय! मध्य रेल्वेचा गेमचेंजर प्लॅन, काम सुरू!


