हळद लागवडीचा निर्णय
ऊस काढणीनंतर शेताची योग्य मशागत करून त्यांनी हळद लागवडीचे नियोजन केले. प्रथम रोटरच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करण्यात आली आणि सरी सोडून त्यामध्ये सुमारे ५० किलो ताग पेरण्यात आला. ताग उगवल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून तो हिरवळीचे खत म्हणून जमिनीत गाडण्यात आला. यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून मातीची सुपीकता सुधारली. त्यानंतर पुन्हा रोटर चालवून सुमारे साडेचार फूट रुंदीचे बेड तयार करण्यात आले.
advertisement
‘सेलम’ जातीचे बियाणे लागवड
हळद लागवडीसाठी सांगली येथून उच्च दर्जाचे ‘सेलम’ जातीचे बियाणे आणण्यात आले. साधारणपणे एकरी ८५० ते ९०० किलो बियाण्याचा वापर करण्यात आला. लागवडीपूर्वी बियाण्यांची योग्य उगवण होण्यासाठी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बीजप्रक्रिया करण्यात आली. कुदळीने खण करून लागवड करण्यात आली असून, लागवडीपूर्वीच बेसल डोस म्हणून डीएपी खत देण्यात आले.
पिकाच्या वाढीदरम्यान गरजेनुसार खुरपणी करण्यात आली. फुटवे चांगले येण्यासाठी आणि गड्ड्यांची फुगवण योग्य होण्यासाठी तीन टप्प्यांत खतांचा वापर करून भर देण्यात आली. कीड व रोग नियंत्रणासाठी प्रत्येक अमावास्येला कीटकनाशकासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्यात आली, तर पौर्णिमेला बुरशीनाशकाची फवारणी करण्यात आली. या नियोजनामुळे पिकाची वाढ एकसारखी आणि निरोगी झाली.
नऊ महिन्यांत आलं पीक
साधारण साडेआठ ते नऊ महिन्यांनंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने हळद काढण्यात आली. त्यामधून बियाण्यासाठी योग्य गड्डे वेगळे करून सावलीत साठवण्यात आले, तर उर्वरित हळद कुकर पद्धतीने उकडून वाळवण्यात आली. जवळपास महिनाभर वाळवणीनंतर मशीनद्वारे पॉलिश करून दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आणि सांगली बाजार समितीत लिलावासाठी पाठवण्यात आले.
लिलावात सोर गड्ड्याला प्रतिक्विंटल २५ हजार रुपये, उच्च प्रतीच्या गड्ड्याला १६ हजार, अंगठा गड्ड्याला १३ हजार तर दुय्यम प्रतीच्या गड्ड्याला १२ हजार रुपये दर मिळाला. बियाण्यासाठी ठेवलेली सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची हळद आणि वाळवणीसाठी वापरलेले ३० हजार रुपयांचे नेट यासह एकूण उत्पन्न साडेअकरा लाख रुपयांपर्यंत गेले.
शेतकऱ्यांना सल्ला काय?
लालासाहेब पाटील यांचा आधुनिक शेतीकडे विशेष कल असून, हळदीसोबतच ते आले, पपई आणि ऊस अशी पिकेही घेतात. “शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी हळद व आले यांसारखी पिके घ्यावीत. हळद हे भारताचे पेटंट पीक असून भविष्यात वायदे बाजार सुरू झाल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उसाला पर्याय म्हणून अशी पिके घेतली तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती निश्चितच होऊ शकते,” असा सल्ला त्यांनी दिला आहे.
