मुंबई : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमधील पिकांवर मोठा फटका बसला आहे. एकूण ६५४ महसूल मंडळांमध्ये खरीप हंगामातील विविध पिकांचे नुकसान नोंदले गेले आहे. आतापर्यंत काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे, तर उर्वरित भागात पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासन स्तरावर तातडीच्या उपाययोजना सुरू आहेत. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.
मोठ्या प्रमाणात बाधित क्षेत्र
अतिवृष्टीमुळे राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (सुमारे ४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र थेट बाधित झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या मुख्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, काही भागांत भाजीपाला, फळपिके, ऊस, कांदा, बाजरी, ज्वारी आणि हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे
नांदेड – ७,२८,०४९ हेक्टर
यवतमाळ – ३,१८,८६० हेक्टर
वाशीम – २,०३,०९८ हेक्टर
अकोला – १,७७,४६६ हेक्टर
धाराशिव – १,५७,६१० हेक्टर
बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर
या जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
बाधित जिल्ह्यांची यादी
नांदेड, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे हे जिल्हे अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत.
शासनाचे प्रयत्न
सरकारकडून पंचनामे पूर्ण झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित भागात हे काम जलदगतीने करण्यात येत आहे. कृषी विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे या प्रक्रियेवर काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती लवकरच मदतीचा लाभ पोहोचविण्यासाठी शासन निर्धाराने कार्यरत असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी ही मोठी आपत्ती ठरली आहे. लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने खरीप हंगामाचे उत्पादन धोक्यात आले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले असून, पंचनामे आणि आर्थिक सहाय्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.