मुंबई : भारत आणि रशियामधील दीर्घकालीन मैत्रीला आज नव्या उंचीवर नेणारे महत्त्वाचे करार नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 23 व्या भारत–रशिया वार्षिक शिखर परिषदेत करण्यात आले. संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शिक्षण, संस्कृती, माध्यमे तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.
advertisement
निर्णय काय?
विशेष म्हणजे भारत आणि रशिया संयुक्तपणे युरिया उत्पादन करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली असून, याचा थेट फायदा भारतीय शेतकऱ्यांना होणार आहे.
करार का महत्वाचा?
युरिया उत्पादनाच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF), नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL) या भारतीय सार्वजनिक कंपन्या रशियन कंपन्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश रशियातील विपुल नैसर्गिक वायू आणि अमोनियाच्या साठ्यांचा वापर करणे हा आहे, जे भारतासाठी आवश्यक पण आयातीवर अवलंबून असलेले कच्चे माल आहेत.
या प्रकल्पाची प्राथमिक तयारी सुरू करण्यासाठी भारतीय आणि रशियन कंपन्यांमध्ये नॉन-डिस्क्लोजर करार (NDA) करण्यात आला आहे. सध्या जमीन उपलब्धता, नैसर्गिक वायू व अमोनियाच्या किमती आणि वाहतूक व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. एका माहितीनुसार, या प्रकल्पातून दरवर्षी 20 दशलक्ष टनांहून अधिक युरिया उत्पादन होण्याची क्षमता असू शकते.
काय फायदा होणार?
तज्ज्ञांच्या मते, युरिया करार हा केवळ आर्थिकच नाही तर धोरणात्मक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक बाजारपेठेत झालेल्या अस्थिरतेमुळे भारतीय शेतकऱ्यांना खतांच्या तुटवड्याचा सामना करावा लागला होता. रशियामध्ये उत्पादन केंद्र उभारल्याने भविष्यातील किंमतवाढ आणि पुरवठ्यातील अडथळ्यांपासून भारताला संरक्षण मिळणार आहे.
दरम्यान, या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी 2030 पर्यंत भारत–रशिया आर्थिक सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांचा विकास करण्यासाठी एक दीर्घकालीन कार्यक्रमही स्वीकारला. यामध्ये व्यापार, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.
