मुंबई : पारंपरिक शेती व्यापाराच्या चौकटी मोडत एका तरुण उद्योजकाने भारतीय कृषी-व्यवसायात नवा विचार रुजवला आहे. ‘फ्रेश एन गुड’ या स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करणारी एक वेगळी आणि टिकाऊ व्यवस्था उभी राहिली आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामागचा उद्देश केवळ फळांची खरेदी-विक्री करणे नसून, शेतकऱ्यांना योग्य दर, बाजारपेठेची खात्री आणि नाशवंत फळांमधील तोटा कमी करून देणारी ‘फार्मर-फर्स्ट’ साखळी उभारणे हा आहे. मॅंगोस्टीन, रामबुतान, एवोकॅडो यांसारखी भारतात तुलनेने दुर्लक्षित किंवा मर्यादित बाजारपेठ असलेली फळे थेट शहरांतील ग्राहकांपर्यंत आणि परदेशी बाजारात पोहोचवणे हे या संकल्पनेचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं आहे. या ‘फार्म-टू-फोर्क’ मॉडेलमुळे कंपनीने मागील आर्थिक वर्षात 1.5 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल साध्य केली आहे.
advertisement
कशी झाली सुरुवात?
कार्तिक सुरेश यांनी केरळ आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांकडून विदेशी फळांची थेट सोर्सिंग करून या स्टार्टअपची सुरुवात केली. यापूर्वी खास निर्यातीपुरती किंवा मोजक्याच ग्राहकांपर्यंत मर्यादित असलेली फळे आता थेट भारतीय बाजारात उपलब्ध झाली. या उपक्रमात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दर ठरवण्याची पद्धत. स्थानिक व्यापाऱ्यांकडील एकरकमी आणि अनिश्चित दरांच्या जागी किमान आधारभूत किमतीवर आधारित (एमएसपी) खरेदीची हमी देण्यात आली. उदाहरणार्थ, बाजारभाव कितीही बदलला तरी रामबुतानसाठी शेतकऱ्यांना प्रति किलो 125 रुपये निश्चित दिले जातात. या पारदर्शक आणि विश्वासार्ह धोरणामुळे 200 पेक्षा अधिक शेतकरी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.
फणसाने दिली नवीन दिशा
दोन वर्षांच्या प्रवासानंतर कार्तिक यांना फणसाच्या बाजारपेठेत मोठी संधी दिसून आली. शहरी ग्राहक फणस सोलण्याचा त्रास, स्वच्छतेचा प्रश्न आणि विविध जातींबाबत माहिती नसल्यामुळे तो खरेदी करण्यापासून दूर राहतात, हे त्यांनी ओळखलं. यावर उपाय म्हणून जानेवारी 2025 मध्ये सोललेले, खाण्यासाठी तयार फणसाचे गरे 200 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये बाजारात आणण्यात आले. घाऊक बाजारात 100 रुपयांना विकल्या जाणाऱ्या या उत्पादनाला अल्पावधीतच चांगली मागणी निर्माण झाली.
या नवकल्पनेमुळे फणसाचे मूल्य अक्षरशः बदलले. काही महिन्यांत मासिक विक्री 1000 पॅकेटवरून 3000 पॅकेटपर्यंत पोहोचली. स्थानिक बाजारात 20 किलो फणसाला अवघे 12 रुपये मिळत असताना, या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्याच फणसासाठी 800 रुपयांपर्यंत दर मिळू लागला.
कंपनीचे ऑपरेशन्स केरळमधील तीन जिल्ह्यांत खरेदी केंद्रे आणि कलेक्शन टीम्सच्या माध्यमातून चालतात. नाशवंत फळांची वाहतूक आणि साठवण हा मोठा प्रश्न असला, तरी प्री-सेल बुकिंग, जलद वाहतूक आणि तीन कोल्ड स्टोरेज युनिट्सच्या मदतीने ग्राहकांपर्यंत 48 तासांत उत्पादने पोहोचवली जातात. मागील हंगामात सुमारे 80 टन रामबुतान आणि 100 टनांहून अधिक फणसाची विक्री झाली आहे.
12 लाखांपासून 1.5 कोटीची उलाढाल
पहिल्या वर्षी केवळ 12 लाखांची उलाढाल असलेला हा स्टार्टअप आज 1.5 कोटींपेक्षा अधिक महसुलावर पोहोचला आहे. पुढील टप्प्यात दुबई आणि कॅनडात फणसाच्या गऱ्यांचे नमुने पाठवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मजबूत करण्याचा कार्तिक यांचा मानस आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट, प्रामाणिक आणि फायदेशीर नातं निर्माण करणं हेच या यशस्वी प्रवासामागचं खरे बळ ठरत आहे.
