मुंबई : राज्यातील कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा अखंडित आणि कार्यक्षम पद्धतीने मिळावा यासाठी महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेवर आधारित नवीन धोरण राबविण्यात येत आहे. पारंपरिक विद्युत खांबांवर आधारित वीजपुरवठा अनेक ठिकाणी बंद करण्यात आला असून, त्याऐवजी अधिक किफायतशीर आणि दीर्घकालीन उपाय म्हणून सौरऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या मागणीचा ताण कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे धोरण तातडीने लागू केले जात आहे.
advertisement
महावितरणने आतापर्यंत 2 हजार 773 मेगावॉट क्षमतेचे तब्बल 512 सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कृषिपंपांना दिवसा स्वच्छ, स्थिर आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. दीर्घकालीन वीज खरेदी करारांमध्येही महावितरणने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना अधिक जागा देत 65 टक्के पर्यंत सौर आणि इतर अक्षय ऊर्जेचा समावेश केला आहे. सध्या एकूण 72 हजार 918 मेगावॉट क्षमतेच्या वीजखरेदी करारांमध्ये अक्षय ऊर्जेला विशेष प्राधान्य दिलेले आहे.
निर्णय का घेतला?
अधीक्षक अभियंता अमित बोकिल यांनी सांगितले की, “ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेने महावितरणने सौरऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या 512 सौर प्रकल्पांमुळे लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळत आहे.” महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक 60 टक्के सौर कृषिपंप असलेले अग्रगण्य राज्य ठरले आहे. सध्या 6 लाख 47 हजार सौर कृषिपंप कार्यरत असून, दिवसाच्या वेळेत शेतकऱ्यांना नियमित आणि स्थिर वीजपुरवठा मिळत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
याशिवाय, राज्यात कोठेही भारनियमन लागू न करता विक्रमात्मक 26 हजार 495 मेगावॉट विजेचा सुरळीत पुरवठा सुरू ठेवण्यात महावितरणला यश मिळाले आहे. सूक्ष्म नियोजन, प्रणाली व्यवस्थापन आणि सौरऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील वीज पुरवठा अधिक स्थिर झाला आहे.
विजेच्या मागणीचे अचूक नियोजन आणि वीजखरेदीचे व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी महावितरणने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित केली असून, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यातील वीज मागणीचा अचूक अंदाज शक्य होत आहे. कमी खर्चात, कार्यक्षम आणि वेळेवर वीज खरेदी करता यावी यासाठी एआय-आधारित प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या तंत्रज्ञानामुळे आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेणे आणि विजेचे नियोजन अधिक सुलभ झाले आहे.
