मुंबई : देशातील शेती परंपरा मोठ्या वेगाने बदलत आहेत आणि शेतकरी आता रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांकडून या पद्धतीचा सक्रिय प्रचार केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सतत नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करण्यावर भर देत आहेत. त्याच अनुषंगाने, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमधून नैसर्गिक शेतीविषयीचा अनुभव शेअर करत दक्षिण भारतातील नव्या प्रयोगशील शेती मॉडेल्सचे कौतुक केले आहे.
advertisement
दोन आठवड्यांपूर्वी कोइम्बतूर येथे झालेल्या दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित होते. त्या अनुभवाचे त्यांनी केलेले वर्णन सोशल मीडियावर चर्चेत आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना "एक एकर, एक हंगाम" या सूत्राने सुरुवात करण्याचा सल्ला देत नैसर्गिक शेतीचा आत्मविश्वास टप्प्याटप्प्याने वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, तरुणांनी एफपीओमध्ये सहभागी होऊन स्वतःचे स्टार्टअप उभे करावेत, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा निर्माण होईल.
पीएम मोदींची पोस्ट काय?
मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, ऑगस्ट महिन्यात तामिळनाडूतील काही शेतकऱ्यांनी भेट घेऊन नैसर्गिक पद्धतीने शेती अधिक उत्पादक कशी होते हे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांच्या निमंत्रणावरूनच 19 नोव्हेंबर रोजी मोदी कोइम्बतूरला गेले. एमएसएमईचे प्रमुख केंद्र असलेल्या या शहरात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीवरील परिषद आयोजित झाली होती.
नैसर्गिक शेती ही भारताच्या पारंपारिक कृषी ज्ञानाशी आधुनिक पर्यावरणीय दृष्टिकोनाची सांगड घालते. यात रासायनिक खते, कीटकनाशके किंवा महागडे इनपुट्स न वापरता मातीची सुपीकता सेंद्रिय अवशेष, आच्छादन आणि नैसर्गिक वायुवीजनाद्वारे वाढवली जाते. वनस्पती, जनावरे आणि पर्यावरण यांच्यातील सहअस्तित्व वाढवणे हा या पद्धतीचा प्रमुख पाया आहे.
या परिषदेत शेतकऱ्यांशी झालेला थेट संवाद त्यांच्यासाठी सर्वात संस्मरणीय क्षण असल्याचे मोदींनी लिहिले. अनेक शेतकऱ्यांनी कॉर्पोरेट करिअर, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या सोडून पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या ध्येयवेड्या वृत्तीने आणि जमिनीशी असलेल्या नात्याने पंतप्रधान प्रभावित झाले.
अनेक शेतकऱ्यांची दिली उदाहरणे
एक शेतकरी 10 एकरांवर बहुस्तरीय शेती करत केळी, नारळ, पपई, हळद आणि मिरपूड पिकवतो तसेच 60 देशी गायी व 400 शेळ्या पाळतो. दुसरा शेतकरी पारंपारिक भाताच्या जाती जतन करत त्या आधारे हेल्थ मिक्स, चॉकलेट, पफ्ड राइस आणि प्रोटीन बार तयार करतो.
एक पदवीधर शेतकरी 15 एकर नैसर्गिक शेती मॉडेल विकसित करून 3,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो. काही शेतकरी स्वतःचे एफपीओ चालवत बायोइथेनॉल, सीबीजीसाठी कसावा-आधारित उत्पादनांचा प्रचार करतात. काही तरुण समुद्रातील शैवालांपासून जैवखते आणि बायोचार तयार करत मातीचे आरोग्य सुधारत आहेत.
मोदींनी नमूद केले की, विविध पार्श्वभूमी असूनही या सर्व शेतकऱ्यांत चार समान तत्त्वे आहेत. मातीचा आदर, शाश्वत शेतीची निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकीय वृत्ती. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आधीच लाखो शेतकऱ्यांना जोडत आहे. महिलांचा वाढता सहभाग, बाजरी सारख्या पिकांची वाढती मागणी आणि संस्थात्मक कर्ज उपलब्धतेने या परिवर्तनाला वेग मिळत आहे.
शेवटी, पंतप्रधान मोदी म्हणाले की कोइम्बतूरमध्ये पाहिलेले विज्ञान, नवकल्पना आणि सामूहिक प्रयत्नांचे मिश्रण भारतीय शेतीला अधिक उत्पादक, सुरक्षित आणि भविष्योन्मुख बनवण्याकडे एक मोठे पाऊल आहे.
