मागील शंभर वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे स्थानिक सांगतात. अनेकदा मान्सूनपूर्व पाऊस वेळेआधी दाखल होतो. परंतु यंदाप्रमाणे एकसारखा लागून राहत नाही. सचिन करमाळे सांगतात की, “शिराळा तालुक्यात विशेषतः धूळ वाफेवरील पेरण्या केल्या जातात. रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस पेरण्या होतात. परंतु यंदा 12 मे पासून सुरू झालेला मान्सून पूर्व पाऊस जूनच्या अखेरीपर्यंत सुरूच राहिला. मध्यंतरी थोडी उघडीप मिळेल अशी शेतकऱ्याला आशा होती. परंतु, तसे झाले नाही. परिणामी गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली शिराळ्यातील धूळ वाफेवरील पेरणीची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित झाली.”
advertisement
हातात राहील पैसा, आंतरपीक पद्धती कशी फायदेशीर? प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितला अनुभव, Video
धूळवाफेवरील पेरणीची परंपरा खंडित
प्रत्येक वर्षी शिराळा तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर धूळ वाफेवरील पेरणी करतात. वळवाच्या पावसानंतर मऊ झालेल्या शेतांमध्ये पूर्व मशागत करतात. रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरड्या मातीत पेरणी केली जात होती. यंदा मे महिन्यातील वळीव, ढगफुटी, बिगरमोसमी व त्यानंतर पूर्वमोसमी अशा वेगवेगळ्या रुपात झालेल्या पावसाने धूळवाफेवरील पेरण्या करताच आल्या नाहीत. यामुळे धुळवाफेवरील पेरणीची परंपरा खंडित झाली.
पेरणी झालेल्या क्षेत्रास पाखरांचा वाढता धोका
शेतकऱ्यांनी माळरानांमध्ये भुईमुगाच्या पेरण्या केल्या आहेत. तसेच काही शेतांमध्ये सोयाबीन पेरले आहे. परंतु, वेळेवर पेरण्या न झाल्याने पारवे, लांडोर अशी पाखरे बिया उपसत आहेत. काही शेतांमध्ये अति पावसाने सोयाबीन कुजले आहे. संकटांच्या मालिकेमधून तुरळक ठिकाणी झालेल्या पेरणीतून उत्पादन हाती लागेल याची शाश्वती नाही.
पारंपरिक भात वाणांचीच पेरणी
इंद्रायणी सारख्या सुधारित भातांच्या लावणी देखील शिराळा तालुक्यात करतात. परंतु, शिराळ्यात पिकणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जाड्या भाताची पेरणीच केली जाते. हीच धूळपेरणी यंदा करता आली नसल्याने शिराळ्यातील पारंपारिक भात शेती संकटात सापडल्याचे करमाळे सांगतात.
मोजक्या लोकांकडेच पारंपारिक वाण टिकून
शिराळा तालुक्यामध्ये रोजगाराच्या संधी फार कमी असल्याने अनेक लोक मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. येणाऱ्या पिढ्या देखील शेतीपासून दूर शहरांमध्ये राहत असल्याने पडीक शेती क्षेत्र वाढले आहे. काही भागांमध्ये पाण्याची उपलब्धता होईल तसे उसाचे क्षेत्र वाढत आहे. या सगळ्या कारणांनी पारंपारिक भात शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सुधारित आणि संकरित वाणांचा वापर वाढल्याने शिराळ्यातील मूळचे पारंपरिक वाण काही वाड्यांवर मोजक्याच लोकांकडे टिकून आहेत.
शिराळ्यातील पारंपरिक भात वाण
‘शिराळी जोंधळा’ नावाने प्रचलित असलेला भात मूळचा शिराळ्यातील लोकप्रिय वाण आहे. शिराळी जोंधळा हा भात वाण आजही शिंदेवाडी परिसरामध्ये टिकून असल्याचे स्थानिक सांगतात. तसेच शिराळ्यातील उत्तर भागामध्ये ‘खरपा’, ‘शिराळी जाडा’ असे भात वाण काही शेतकऱ्यांनी टिकवून ठेवले आहेत. ‘शिराळा इंद्रायणी’ म्हणून प्रसिद्ध असलेला शिराळ्यातील पारंपारिक भात वाणास बाजारपेठेत चांगली मागणी आहे. परंतु या भातचे उत्पादन कमी प्रमाणात होते. इतर बियाणांच्या तुलनेत शिराळा इंद्रायणीस कमी उतारा असल्याचे भात उत्पादक सांगतात. विशेष म्हणजे शिराळ्याच्या पश्चिम भागामध्ये काळुंद्रेच्या पट्ट्यात शेतकऱ्यांकडून भारतातील वेगवेगळ्या सुधारित भात वाणांचे प्रयोग सुरू आहेत. यातून शिराळ्यातील भात वाणे टिकून राहतील.
तणनाशकांचा वाढता वापर
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे भात शेतीमध्ये तणनाशकाचा वापर वाढला आहे. यामुळे शिराळ्यातील पारंपारिक शेती धोक्यात आल्याचे स्थानिक सांगतात. शिराळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण भातशेती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असताना यंदाच्या निसर्गचक्राच्या बदलात आहे ते वाण देखील संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असे करमाळे सांगतात.





