अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीत गुरुवारी सुमारे ५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सामान्यतः चांगल्या प्रतीच्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास असावे लागते. मात्र सध्या येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा २० टक्के आणि त्याहून अधिक आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल फक्त ३७५० रुपये दर जाहीर केला.
भिजलेल्या सोयाबीनला जास्त दर नाही
advertisement
व्यापाऱ्यांच्या मते, हमीभाव जरी ५३२८ रुपये प्रति क्विंटल असला तरी पावसामुळे भिजलेल्या सोयाबीनला तसा दर मिळणे शक्य नाही. बाजारात सध्या उपलब्ध सोयाबीन ओलसर असल्याने त्याचे भाव २८०० ते ३७५० रुपयांपर्यंतच आहेत.
शेतकऱ्यांची अडचण, भावात तोटा
केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ५३२८ रुपयांचा हमीभाव घोषित केला असला तरी बाजारात भाव सातत्याने दबावात आहेत. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनचे भाव ४००० ते ४२०० रुपयांच्या पुढे गेलेले नाहीत. हमीभावाच्या तुलनेत दर्यापूर बाजारात मिळणारा दर तब्बल १५७८ रुपयांनी कमी आहे.
अमरावती जिल्ह्यातील इतर काही बाजार समित्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे. व्यापाऱ्यांकडून "ओलावा जास्त आहे" हे कारण देऊन सोयाबीन कमी भावात खरेदी केले जात आहे. शेतकरी म्हणतात की, मेहनतीने घेतलेले पीक जर हमीभावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयांनी कमी दरात विकावे लागत असेल, तर त्यांच्या हाती नुकसानाशिवाय काहीच उरणार नाही.
सोयापेंड निर्यातीची मागणी
सोयाबीनच्या दरावर थेट परिणाम करणारा घटक म्हणजे सोया पेंडचा बाजारभाव. या दरातील चढउतारामुळे सोयाबीनची किंमतही बदलते. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने सोया पेंडच्या निर्यातीस प्रोत्साहन द्यावे.म्हणजे शेतकऱ्यांना जास्त दर मिळतील मात्र केंद्र सरकारच्या स्तरावर अद्याप या मागणीचा विचार झालेला नाही.
राज्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच बाजारातील सोयाबीन दर हमीभावापेक्षा मोठ्या फरकाने कमी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन आणि हमीभावावर खरेदी यंत्रणा प्रभावीपणे राबवली नाही तर या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
