अहवालानुसार, पश्चिम आशियाकडे जाणारी भारताची सुमारे १ लाख कोटी रुपयांची कृषी निर्यात धोक्यात आली आहे. हजारो कंटेनर बंदरांवर अडकले असून निर्यातदार आणि शेतकरी दोघांमध्येही चिंता वाढली आहे.
सागरी अडथळ्यांचा व्यापारावर मोठा परिणाम
Global Trade Research Initiative (GTRI) च्या अहवालानुसार, भारतातून पश्चिम आशियात जाणाऱ्या सुमारे ११.८ अब्ज डॉलर किमतीच्या कृषी आणि अन्न उत्पादनांवर या तणावाचा परिणाम होत आहे. यामध्ये तांदूळ, फळे, मसाले आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांचा समावेश आहे.
advertisement
सध्या ३,००० हून अधिक कंटेनर बंदरांवर अडकले असून, सागरी, हवाई आणि काही प्रमाणात भूमार्गांवरही वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच वाढलेले विमा दर आणि मालवाहतुकीचा खर्च यामुळे निर्यात अधिक महाग झाली आहे.
बासमती तांदळाच्या निर्यातीवर मोठा फटका
या संकटाचा सर्वाधिक परिणाम बासमती तांदळाच्या निर्यातीवर झाला आहे. सध्या सुमारे ४ लाख टन बासमती तांदूळ बंदरांवर किंवा सागरी मार्गांवर अडकून पडला आहे.
भारताचा बासमती तांदळाचा प्रमुख ग्राहक असलेल्या इराणचा एकूण निर्यातीमध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा बासमती निर्यातदार देश असून २०२४-२५ मध्ये भारताने ६०.६५ लाख टन तांदूळ निर्यात केला होता. CRISIL रेटिंगनुसार, भारताच्या बासमती निर्यातीपैकी ७० ते ७२ टक्के हिस्सा पश्चिम आशियात जातो, त्यामुळे या प्रदेशातील तणावाचा परिणाम अधिक तीव्र झाला आहे.
वाहतूक खर्चात मोठी वाढ
युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंटेनरची कमतरता निर्माण झाली असून ‘वॉर-रिस्क’ विमा लागू झाल्याने वाहतूक खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. निर्यातदारांच्या मते, प्रत्येक कंटेनरमागे सुमारे २,००० डॉलर (१.८ लाख रुपये) अतिरिक्त खर्च येत आहे. हा खर्च त्यांना स्वतःच्या नफ्यातून उचलावा लागत असल्याने व्यापारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना कमी दर, उत्पन्नावर परिणाम
निर्यात ठप्प झाल्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. बासमती तांदळाचे दर प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांनी घसरले आहेत. त्याचप्रमाणे, फळे आणि भाजीपाला निर्यात न झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढला असून दर कमी झाले आहेत.महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतील शेतकरी यामुळे अडचणीत आले आहेत.
मांस व सागरी उत्पादनांवरही परिणाम
या तणावाचा परिणाम मांस आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीवरही झाला आहे. २०२५ मध्ये भारताने पश्चिम आशियात सुमारे १६,७३० कोटींची निर्यात केली होती.
ताजे व गोठवलेले गोमांस, मेंढी-शेळीचे मांस आणि कोळंबी यांसारख्या उत्पादनांची मोठी निर्यात या प्रदेशात होते. संकट दीर्घकाळ टिकल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील प्रक्रिया उद्योगांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
बंदरांवर फळे-भाजीपाला अडकला
जेएनपीटी येथे सुमारे १,००० कंटेनरमध्ये १,२०० कोटी रुपयांचा फळे-भाजीपाला साठा अडकून पडला आहे.
यामध्ये केळी, द्राक्षे, डाळिंब आणि कांदा यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. तसेच जेबेल अली पोर्ट येथील वाहतुकीतील अडथळ्यांमुळे २० ते २५ दिवसांचा विलंब होत आहे. त्यामुळे नाशिकमधील द्राक्षांसारख्या नाशवंत उत्पादनांचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे.
दुग्ध व कुक्कुटपालन क्षेत्रालाही फटका
या परिस्थितीचा दुग्ध आणि कुक्कुटपालन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. सुमारे २,३६० कोटी रुपयांच्या दुग्धजन्य निर्यातीवर परिणाम झाला आहे.
अंड्यांच्या निर्यातीतील घटेमुळे देशांतर्गत बाजारात दर घसरले आहेत. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अंड्यांचे दर ७ वरून ४.६० रु प्रति अंड्यापर्यंत खाली आले आहेत. तसेच, कलिंगडासारख्या फळांचे दर काही भागांत ७ प्रति किलोपर्यंत घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.
