मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेती आणि जनजीवन दोन्हीवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा आणि सरकारच्या पुढील उपाययोजनांची माहिती दिली.
advertisement
७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान
भरणे यांनी सांगितले की, राज्यातील एकूण ७० लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह अनेक खरीप पिके पावसामुळे पाण्याखाली गेली असून काही भागांत उभे पीक कुजून खराब झाले आहे.
पशुधनाचेही मोठे नुकसान
शेतकऱ्यांच्या शेतीबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. अनेक ठिकाणी गोठे पाण्याखाली गेले असून गायी, म्हशी यांचे मृत्यू झाले आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले असून पशुधनधारकांनाही नुकसानभरपाई दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पंचनामे युद्धपातळीवर
भरणे यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि महसूल यंत्रणा युद्धपातळीवर पंचनाम्याचे काम करत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसानभरपाई वितरित केली जाईल
मंत्री मंडळाची बैठक निर्णायक
आज होणाऱ्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत पूरस्थितीवरील सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. असही मंत्री भरणे म्हणाले.
३० जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. मराठवाडा, विदर्भ विभागासह अनेक जिल्हे पावसाने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली राहिल्याने आगामी रब्बी हंगामासाठी जमीन तयार करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसानभरपाईसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. नैसर्गिक आपत्ती ही कुणाच्याही हातात नसली तरी शासनाने वेळेत मदत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.