पीडित तरुणी लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे पहिले लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र पतीच्या गैरवर्तनामुळे ती माहेरी राहत होती. त्याच दरम्यान तिची ओळख पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या महानंदा नावाच्या महिलेशी झाली. या महिलेनं दुसरे लग्न करून देण्याचे आश्वासन देत तिला पुण्यात नेले. तेथे अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.
advertisement
Beed: जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा, जावई पिकात लपून बसला अन्...
या लग्नाला अवघे दहा दिवस झाले असतानाच संबंधितांनी तिला त्या ठिकाणाहून काढून दुसऱ्या व्यक्तीकडे साडेचार लाख रुपयांत विकले. त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. महानंदा आणि तिच्या साथीदारांनी तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने पुन्हा एकदा 4 मार्च 2026 रोजी आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावले. या व्यवहारातूनही साडेचार लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे लग्नाच्या नावाखाली महिलांची विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महिलेवरचा अत्याचार इतक्यावरच थांबला नाही. 6 मार्च रोजी पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्याचा दबाव टाकण्यात आला. वारंवार होत असलेल्या या व्यवहारांमुळे आणि भविष्यातील अत्याचाराच्या भीतीने पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली आली. अखेर या असह्य परिस्थितीमुळे तिने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी आष्टी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये महानंदा, तिचा पती तसेच तुळजापूर येथील आणखी दोन जणांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 आणि 61 अंतर्गत मानवी तस्करी व फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या आंतरजिल्हा रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






