वारंवार "ए चोरा" अशी हाक मारल्याने मनात राग धरलेल्या संशयिताने थेट पती-पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचा अवघ्या 8 तासांत उलगडा करत लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. पंडित रावणकुळे (32, रा. गरसुळी) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
दारुच्या नशेत केली हत्या...
मृत दाम्पत्य पुष्पलता कातळे (51) आणि रावसाहेब कातळे (60) हे गरसुळी शिवारातील आखाड्यावर राहत होते. त्यांचा मुलगा हैदराबाद येथे नोकरीस आहे. रविवारी (25 मे) मध्यरात्री, दारूच्या नशेत असलेला रावणकुळे त्यांच्या आखाड्याजवळ गेला. पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या पुष्पलता यांच्या कानावर त्याने चुलीजवळ पडलेला कुकर फेकून मारला, ज्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. त्यानंतर दगडाने डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. आरडाओरड करणाऱ्या दिव्यांग रावसाहेब यांना त्याने उचलून जवळील विहिरीत फेकून दिले.
advertisement
मंगळसूत्रामुळेच आरोपीच्या मुसक्या आवळल्या..
हत्या केल्यानंतर आरोपीने मृत पुष्पलता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. पुढच्या दिवशी त्याने गावातील काही व्यक्तींना फोन करून "माझ्या बायकोचे मंगळसूत्र विकायचं आहे" अशी विचारणा केली होती. पोलिसांना ही माहिती मिळाली. त्याशिवाय मृत महिलेचे मंगळसूत्र गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यानंतर पोलिसांच्या संशयाची सुई थेट रावणकुळेकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, बुधवारी सकाळी एका शेतकऱ्याला विहिरीत रावसाहेब कातळे यांचा मृतदेह तरंगताना दिसला आणि प्रकरण उघडकीस आले. दोन दिवस मृतदेह तिथेच असल्याने स्थिती अति गंभीर झाली होती.
बघ्यांच्या गर्दीत उभा, पोलिसांसमोर टाहो फोडला...
घटनेच्या दिवशी आरोपी रावणकुळे देखील बघ्यांच्या गर्दीत उभा होता. पोलिसांशी बोलताना त्याने "पुष्पा काकूला कसं मारलंय हो?" असा थेट प्रश्नही विचारल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.