आरोपीच्या जबाबात धक्कादायक माहिती...
या अपघात प्रकरणीा अटकेत असलेल्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. विशेष म्हणजे मद्यपान केलेल्या मुळेला कारच चालवता येत नसल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहन परवाना नसल्याचे त्यानेच पोलिसांना सांगितले आहे. वाहन चालवता येत नसतानाही कार कशी चालवली, वाहतूक पोलीस काय करतात, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
advertisement
जयराम शिवाजी मुळे असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. तर अपघातावेळी कारमध्ये असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय 27) आणि कारचे मालक दिगंबर शिंदे (वय 27) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवून देत सोडण्यात आले आहे. पोलिसांनी शनिवारी मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याबाबत मुळेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. शनिवारी भरधाव कारने चहा प्यायला थांबलेल्या 12 जणांना धडक दिली. यात तीन जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळे याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश फडतडे करत आहेत.
