Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाची गणना बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये केली जाते. आपल्या चित्रपटांद्वारे त्याने केवळ ए-लिस्टर्समध्ये स्थान मिळवलं नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही एक खास ओळख निर्माण केली आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. कॉलेजच्या काळात तो आपल्या मित्रांसोबत दिल्ली-मुंबई ट्रेनमध्ये पैसे मिळवण्यासाठी गाणं गायचा. प्रवाशांकडून जे पैसे मिळायचे, त्याचं ते त्यांच्या ट्रिप्ससाठी फंडिंग करायचे. त्याने एकदा सांगितलं होतं की, या पैशांच्या माध्यमातून गोव्याला वगैरेही त्याला जाता आलं आहे.
advertisement
वडिलांकडून मिळालेला चपलांचा मार
आयुष्मान खुरानाने एका पॉडकास्टमध्ये उघड केलं होतं की, लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याला चपला आणि पट्ट्याने मारलं होतं. त्यामुळे तो ट्रॉमामध्ये गेला होता. एकदा तर फक्त शर्टमधून सिगरेटचा वास येत असल्याने त्याला मार मिळाला होता. विशेष म्हणजे आयुष्मानने धूम्रपान केलं नव्हतं.
वयाच्या 16 व्या वर्षी पहिलं प्रेम
आयुष्मान खुरानाची आणि ताहिरा कश्यप यांची पहिली भेट वयाच्या 16 व्या वर्षी झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 12वी बोर्डच्या परीक्षेदरम्यान सुरू झालेली ही लव्ह स्टोरी पुढे सुरूच राहिली. रिअॅलिटी शो 'रोडीज' जिंकल्यानंतर आयुष्मानचे आयुष्य पूर्णपणे बदलले. आयुष्मानला स्टारडम मिळाला आणि त्यानंतर त्याचा ताहिरासोबत ब्रेकअप झाला. पुढे काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र आले आणि 2008 मध्ये त्यांनी लग्न केलं.
आयुष्मानचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगढमधील एका पंजाबी-हिंदू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव निशांत खुराना होतं, पण जेव्हा तो तीन वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी एका ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार त्याचं नाव बदलून आयुष्मान ठेवलं. आयुष्मानचं संपूर्ण शिक्षण चंदीगढमध्येच झालं आहे. अभ्यासतही तो हुशार होता. लहानपणापासूनच त्याला गाणं-कविता यामध्येही रस होता. आयुष्मानने 2012 मध्ये 'विक्की डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यामी गौतमसोबतची त्याची जोडी आणि चित्रपटाची वेगळी कथा प्रेक्षकांना खूप आवडली. सामाजिक मुद्दे, ह्यूमर आणि संवेदनशीलता यांना एकत्र घेऊन जाणारे चित्रपट निवडण्यावर आयुष्मानचा भर असतो.
आयुष्मानच्या बाला, आर्टिकल 15, अंधाधुन, शुभ मंगल सावधान सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आयुष्मानच्या 'अंधाधुन' या चित्रपटासाठी आयुष्मानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासह इंडस्ट्रीतील मानाचे फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारावरही त्याने आपलं नाव कोरलं आहे. आयुष्मानने आपल्या करिअरमध्ये अनेक वेळा गायक म्हणून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. येणाऱ्या काळात आयुष्मान खुराना मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा भाग म्हणून दिसून येईल.