मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड आणि मल्याळम अभिनेता फरमान खानशी लग्न केलं आणि एकच गदारोळ झाला. तिने फरमानसोबत केरळमधील श्री नैनार देवा मंदिरात हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्नगाठ बांधली आहे. या आंतरधर्मीय विवाहामुळे एकच वाद निर्माण झाला असून लोकांनी त्यांच्यावर लव्ह जिहादचे आरोप केले आहेत.
वडील बळजबरीने लावणार होते लग्न
मोनालिसा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. अशातच तिच्या पालकांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मात्र, मोनालिसाने हा विरोध बाजूला सारत फरमानसोबत सर्वांसमोर लग्न केले आहे. लोकांचा रोष लक्षात घेत आता मोनालिसा आपल्या पतीसह सर्वांसमोर आली असून तिने सर्व पुराव्यांसह या आरोपांवर उत्तर दिलं आहे. मीडियाशी संवाद साधताना तिने सांगितलं की, तिचे वडील तिचं लग्न तिच्या स्वतःच्याच आत्याच्या मुलाशी लावून देण्याचा प्रयत्न करत होते. "तो माझ्या भावासारखा आहे, त्याच्याशी मी संसार कसा करणार?" असा सवाल तिने उपस्थित केला.
advertisement
वडिलांच्या दबावामुळे आणि बळजबरीने गावी नेण्याच्या भीतीमुळे तिने केरळ पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि केरळच्या नेत्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं.
मोनालिसाच्या वयावरून पेटलाय वाद
इतकंच नाही, तर मोनालिसाच्या वयावरून सोशल मीडियावर वाद उभा राहिला होता. अनेकांचा दावा होता की तिने १८ वर्ष पूर्ण केलेली नाहीत. मात्र, यावर फरमान खानने मोनालिसाचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म दाखला मीडियासमोर सादर केला. फरमानने सादर केलेल्या पुराव्यांनुसार, मोनालिसाचा जन्म १ जानेवारी २००८ चा असून ती सध्या १८ वर्षांची आहे. "आमचं लग्न अधिकृतपणे रजिस्टर केलेलं आहे, जर ती अल्पवयीन असती तर कायद्याने हे शक्यच झालं नसतं," असं फरमानने ठामपणे सांगितलं.
मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नाला लव्ह जिहादचे नाव देण्याचाही प्रयत्न झाला. यावर मोनालिसाने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने सांगितल्यानुसार अद्याप दोघांनीही त्यांचा धर्म बदललेला नाही. मोनालिसा म्हणाली, "मी आजही हिंदूच आहे आणि फरमान मुसलमान आहे. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. लग्नासाठी धर्म बदलण्याची गरज नसते, तर मनाचं नातं असावं लागतं." विशेष म्हणजे, फरमान मूळचा उत्तर प्रदेशातील बागपतचा असून त्याने आधी मोनालिसाचा प्रस्ताव नाकारला होता, पण तिची जिद्द पाहून त्याने अखेर होकार दिला.
केरळच्या सरकारने केली मदत
मोनालिसा आणि फरमानची ओळख एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. केरळमधील वातावरण सुरक्षित आणि सर्वधर्मसमभावाचे असल्याने त्यांनी तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी आणि सीपीएम नेते एम.व्ही. गोविंदन यांनी या लग्नाला उपस्थित राहून जोडप्याला आशीर्वाद दिले.
