प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांच्यासोबत रायगडावर गेलेल्या तरडे यांनी ऐतिहासिक किल्ल्याच्या दगडांमध्ये आणि त्यातील खाचांमध्ये पडलेला कचरा, चिप्सची पाकिटे पाहून फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. रायगडावरच्या दगडांना स्पर्श करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या असण्याचा भास होत असतानाच, तरडे यांनी पर्यटकांकडून झालेल्या अपमानाबद्दल तीव्र राग व्यक्त केला.
advertisement
रायगडावरील स्थिती पाहून प्रवीण तरडे कडाडले
प्रवीण तरडे म्हणाले, "आज डॉ. विश्वास पाटील यांच्यासोबत रायगड पाहायला आलो. इथल्या प्रत्येक भिंतीला हात लावताना कधीतरी इथून महाराज गेले असतील, याचा भास होतो... पण आपल्या लोकांनी इथे काय केलंय बघा! ऐतिहासिक वास्तूंच्या खाचांमध्ये कचरा, चिप्सचे पॅकेट्स ठेवण्यात आले आहेत."
ज्यांनी हा कचरा इथे टाकला असेल, त्यांना प्रवीण तरडे यांनी कळकळीची विनंती केली आहे, "बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे! ही कचरा टाकायची जागा नाहीये. इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला, रक्त सांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथं आहेत, याचं भान ठेवा."
डॉ. विश्वास पाटील यांनीही केले आवाहन
यावेळी डॉ. विश्वास पाटील यांनीही आपली भावना व्यक्त केली. पाटील म्हणाले, "महाराजांनी या परिसराचे सोने बनवले आहे. स्पर्श नव्हे, तर हा परिसस्पर्श आहे. ज्याप्रमाणे लोखंडाला स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते, तसा हा परिसर आहे." तरडे यांनी सर्व पर्यटकांना आवाहन केले, "जेवढे पर्यटक इथे येतात, त्यांना एकच विनंती आहे की बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे. निदान रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू शकतो, पण असा दगडांच्या खाचात कोंबलेल्या कचऱ्याचं काय करायचं? रायगड आपला आहे, त्यामुळे जपून!" या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत प्रवीण तरडे यांच्या मताला पाठिंबा दिला आहे.
