आता यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नेमकी ही अपडेट वाहनचालकांना दिलासा देणारी आहे की अजून काही दिवस त्रास सहन कराला लागणाक का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहाड पूल हा कल्याण आणि उल्हासनगर भागातील महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो नागरिक या पुलाचा वापर करतात. पुलावरील रस्ता जीर्ण झाल्यामुळे याला दुरुस्तीची गरज स्पष्टपणे जाणवत होती. अखेर गेल्या आठवड्यात प्रशासनाने पूल संपूर्णपणे बंद करून काम सुरू केले. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. या बदलामुळे काही भागांत वाहतूक कोंडी देखील झाली होती.
advertisement
शनिवारी भाजप आमदार कुमार आयलानी यांनी शहाड पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. आयलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली असून पुढील चार दिवसांत हे काम पूर्ण होईल. अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे काम दिवसरात्र सुरू आहे. सर्व तांत्रिक नियमांचा आणि सुरक्षा मानकांचा काटेकोरपणे विचार करून दुरुस्ती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुलाची मजबुती वाढवण्यासाठी आधी स्ट्रक्चरल तपासणी करण्यात आली. त्यानंतर खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुलाच्या पृष्ठभागावर नवीन डांबराचा थर घातल्यानंतर वाहने अधिक सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे जावू शकतील. याशिवाय पुलाची रंगरंगोटी, सुरक्षा चिन्हे, रेलिंगची तपासणी यांसारखी कामेही केली जात आहेत. अधिकारी सांगतात की, या सर्व कामांनंतर पूल पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.
नेमकी कोणत्या दिवशी सुरू होणार वाहतूक?
पुलाचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. नागरिकांना आणि वाहनचालकांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसांत पुलावर पुन्हा वाहतूक सुरू झाली की उल्हासनगर-कल्याण प्रवास अधिक सोपा आणि जलद होणार आहे.
उल्हासनगर आणि कल्याण शहरातील नागरिकांसाठी शहाड पुलाचे महत्त्व लक्षात घेता, हा पूल लवकरच सुरक्षित आणि नव्या रूपात खुला होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कामाची गती पाहता, पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.
