जालना: उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्या सगळ्यांचीच पावले थंड पेयांच्या दुकानाकडे वळू लागतात. लस्सी, मठ्ठा, उसाचा ताजा रस किंवा कोल्ड्रिंक्स प्रत्येक जण आपापल्या आवडी निवडीप्रमाणे थंड पेय घेतात. त्यातही अनेक जणांचा कल आरोग्यदायी मठ्ठा घेण्याकडे असतो. जालना शहरांमध्ये रेणुका शाही मठ्ठा हा अतिशय प्रसिद्ध आहे. केवळ 10 रुपयांमध्ये मन तृप्त करणारा मठ्ठा मिळतो. दिनेश तेटवाल दिवसभरात तब्बल 1000 ग्लास मठ्ठाची विक्री करतात. यामधून दिवसाला खर्च वजा जाता एक ते दीड हजारांची कमाई होत असल्याचं त्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
7 वर्षांपूर्वी दिनेश तेटवाल यांनी मठ्ठा विक्री करण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच ते स्वतःच दुधापासून दही आणि दह्यापासून ताक तयार करून त्यापासून मठ्ठा बनवतात. मठ्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, शहाजिरा यासारखे वेगवेगळे मसाले घालून त्याला अत्यंत चवदार बनवलं जातं. यामध्ये भरून तळलेली बुंदी टाकली जाते. उन्हाळ्यामध्ये मठ्ठा घेण्यासाठी या स्टॉलवर नागरिक आवर्जून येतात. केवळ 10 रुपयांमध्ये मन तृप्त करणारा चवदार मठ्ठा मिळत असल्याने नागरिकांची इथे नेहमीच गर्दी असते. अनेक जण पाण्याच्या बॉटल मध्ये घरच्यांसाठी देखील पार्सल मठ्ठा घेऊन जातात.
खडकाळ शेत जमिनीतून पिकवलं सोनं, जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटे शेतीमधून 28 लाखांचं उत्पन्न
सध्या उन्हाळ्याची सुरुवात असल्याने दिनेशलाल टेटवाल यांची दिवसभरात 400 ते 500 ग्लास मठ्ठ्याची विक्री होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये हीच विक्री तब्बल 1000 ग्लासापर्यंत पोहोचते. दिवसाला 10 हजार रुपयांची उलाढाल होऊन एक ते दीड हजार रुपयांचा निव्वळ नफा टेटवाल यांच्या हातामध्ये राहतो. आपल्याला कमाई पेक्षा ग्राहकांचं मन तृप्त करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं दिनेश लाल यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं.
उन्हाळ्यात आवर्जून मठ्ठा पितो
“उन्हाळा सुरू झाला की दररोज मी या ठिकाणी मठ्ठा घेण्यासाठी येतो. या मठ्ठ्याची चव ही जालना शहरामध्ये कुठेही मिळत नाही. माझ्याबरोबर माझ्या फॅमिली साठी देखील एक बॉटल मठ्ठा आम्ही घेऊन जात असतो. एक ग्लास मठ्ठा घेतला की आरामात झोप लागते. त्यामुळे माझ्यासह माझी फॅमिली देखील हा मठ्ठा घेतल्याशिवाय राहू शकत नाही,” असं ग्राहक धुराजी अंभोरे यांनी सांगितले.