नियमित व्यायाम न केल्यास शरीरातील स्नायू कमकुवत होतात आणि कार्यक्षमता घटते. हालचालींच्या अभावामुळे वजन वाढणे, चरबी साचणे आणि स्थूलपणाचा धोका वाढतो. याचा थेट परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो. रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, तसेच हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. रक्ताभिसरण मंदावल्याने थकवा, सुस्ती आणि कामातील उत्साह कमी होतो.
advertisement
सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, चवदार आणि हेल्दी मेथी पराठा, रेसिपीचा संपूर्ण Video
व्यायामाच्या अभावाचा परिणाम पचनसंस्थेवरही दिसून येतो. बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन यांसारख्या तक्रारी वारंवार उद्भवतात. हाडे आणि सांधे मजबूत न राहिल्याने गुडघेदुखी, पाठदुखी आणि संधिवाताचे त्रास लवकर सुरू होतात. विशेषतः तरुण वयोगटातही अशा समस्या वाढताना दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. शारीरिक हालचाल कमी झाल्यास मेंदूमधील आनंद देणाऱ्या हार्मोन्सचे स्रवण कमी होते. परिणामी ताणतणाव, चिंता, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव आणि विसराळूपणा वाढतो. झोपेचे चक्र बिघडणे, झोप न लागणे किंवा अपुरी झोप लागणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
दीर्घकाळ व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यास मधुमेह, हृदयविकार आणि प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे चालणे, योगासने, प्राणायाम किंवा कोणताही सोपा व्यायाम करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. नियमित व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.





