रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना काही वेळा शांत झोप न लागणं, मनःस्थितीत बदल होणं, थकवा येणं किंवा शरीर जड वाटणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. अनेक स्त्रिया या बदलांमुळे घाबरू शकतात. या काळात, जीवनशैलीतल्या छोट्या बदलांनी आयुष्य सुखकारक आणि संतुलित होऊ शकतं.
advertisement
एरवीही आणि विशेषत: या काळात आहाराकडे लक्ष देणं महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळात शरीराला अधिक पोषणाची गरज असते, त्यामुळे संतुलित आणि हलका आहार घेणं फायदेशीर ठरतं. आपल्या आहारात ताज्या आणि मोसमी फळांचा समावेश नक्की करा. ही फळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं पुरवतात आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
आहारात गहू, जुना तांदूळ आणि मूग यांसारख्या हलक्या आणि पौष्टिक धान्यांचाही समावेश करू शकता. थोड्या प्रमाणात तूप खाल्ल्यानं शरीर मजबूत होतं आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
रजोनिवृत्तीच्या काळात केवळ आहारच नव्हे, तर दैनंदिन दिनचर्याही महत्त्वाची ठरते. दररोज थोडा वेळ योग आणि ध्यानधारणा केल्यानं शरीर आणि मनाला मोठा दिलासा मिळू शकतो. योगासनांमुळे, शरीराची लवचिकता वाढते आणि तणाव कमी करण्यास मदत होते. ध्यानामुळे मन शांत होतं आणि मनःस्थितीतील चढउतार कमी होतात.
या काळात महिलांना अनेकदा तणाव किंवा चिंता वाढल्याचं जाणवतं, त्यामुळे नियमित ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छ्वासाचे व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतात.
साधे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम शरीराला आतून मजबूत करतात. दररोज काही मिनिटं खोल, संथ श्वास घेण्याचा सराव केल्यानं शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सुधारतं आणि शरीर हलकं वाटण्यास मदत होते. आपल्या दिनचर्येत सकाळ आणि संध्याकाळच्या चालण्यासारख्या हलक्या शारीरिक हालचालींचा समावेश करणं देखील चांगले आहे. यामुळे शरीर सक्रिय राहतं आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
