त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पूजा जाधव यांनी सांगितले की, “हिवाळ्यात हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण घटतं आणि लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं. शिवाय थंडीमुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि त्वचेतील पोषण घटकांचा पुरवठा कमी होतो.” त्यांनी सांगितलं की, हिवाळ्यात दिवसातून दोन ते तीन वेळा मॉइश्चरायझर किंवा नारळ तेलाचा वापर केल्यास त्वचा मऊ राहते.
advertisement
डॉ. जाधव यांनी पुढे सांगितलं की, पाण्याचं प्रमाण कमी घेणं हेही एक मोठं कारण आहे. थंडीत तहान कमी लागल्यामुळे लोक पाणी कमी पितात. परिणामी शरीरात डिहायड्रेशन होऊन त्वचेचा ओलावा कमी होतो. त्यामुळे हिवाळ्यातही रोज किमान दोन ते अडीच लिटर पाणी घेणं आवश्यक आहे. तसेच, आहारात गाजर, संत्री, पपई आणि बदाम यांसारख्या व्हिटॅमिन-ईयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
दरम्यान, आज परार येथे झालेल्या आरोग्य जनजागृती परिषदे दरम्यान आरोग्य विभागाने नागरिकांना त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय सांगितले. त्यात अंघोळीनंतर लगेच नारळ तेल लावणे, रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावणे आणि चेहऱ्यावर ऍलोवेरा जेल वापरणे हे प्रभावी उपाय असल्याचं सांगण्यात आलं. तसेच, मध आणि ओट्सचे मिश्रण फेस पॅक म्हणून वापरल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार राहते.
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना संदेश दिला की, हिवाळ्यात त्वचा सुंदर ठेवण्यासाठी महागड्या क्रीमपेक्षा घरगुती उपायच अधिक फायदेशीर आहेत. पुरेशी झोप, व्यायाम, पौष्टिक आहार आणि पाण्याचं योग्य प्रमाण हे त्वचेचं आरोग्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे. “त्वचा सुंदर ठेवायची असेल तर हिवाळ्यात ओलावा राखणेच सर्वात मोठं सौंदर्य रहस्य आहे,” असा सल्ला डॉक्टरांनी दिला.