अमन साहू असं आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय मुलाचं नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह अंबरनाथ परिसरातील नेवाळी गावात राहत होता. तो सध्या इयत्ता दहावीत शिकत होता. मात्र त्याचं अभ्यासावर फारसं लक्ष नव्हतं. त्याला मोबाईल गेम्सचं वेड लागलं होतं. तो सातत्याने मोबाईलवर बॅटल ग्राऊंड नावाचा गेम खेळायचा. दहावीचं वर्ष असल्याने पालकांनी अमनचे एक्स्ट्रा क्लास लावले होते. तिकडेही त्याचं लक्ष नव्हतं.
advertisement
मुलाने अभ्यासावर लक्ष द्यावं, यामुळे पालकांनी अमनचा मोबाईल फोन काढून घेतला. याचा त्याला प्रचंड राग आला. याच रागातून गुरुवारी सकाळी घरात कुणी नसताना अमनने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
पण दहावीत शिकणाऱ्या मुलानं केवळ मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून अशाप्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. लहान मुलांच्या मोबाईल वापराबद्दल पालकांनी थेट निर्णय न घेता, त्याचं समुपदेशन करत सामंजस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास हिललाईन पोलीस करत आहेत.
