उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चललेल्या या सखोल चर्चेत राज्यातील विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाल्याचे माहिती समोर येत आहे. मात्र, अधिवेशनाच्या काळात झालेल्या या प्रदीर्घ भेटीमुळे राजकीय हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिंदे यांनी संसदेचे सभापती ओम बिर्ला यांचीही भेट घेतली.
advertisement
उदय सामंत तातडीने दिल्लीला रवाना
एकनाथ शिंदे दिल्लीत असतानाच त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. सामंत हे तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय किंवा आगामी राजकीय रणनीतीबाबत या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याने त्यामुळे या दौऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजकारणात मोठे फेरबदल होण्याच्या शक्यता
मुंबईत महत्त्वाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शिंदे यांनी दिल्ली गाठल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याच्या मागण्यांसाठी हा दौरा असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी, या भेटींमधून राज्याच्या राजकारणात काही मोठे फेरबदल होण्याच्या देखील चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात केंद्रीय भाजपची पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. पाच राज्यातील निवडणुका जाहीर होण्याआधी केंद्रीय संचलन समितीची बैठक पार पडली होती.
हे ही वाचा :
