मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदे गटासह भाजप महायुती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर उद्धव ठाकरे हे मनसेला सोबत घेऊन मुंबईवर पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेसनं एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील राजकारणात वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळत आहेत. इथं मराठी विरुद्ध अमराठी असा वाद देखील निर्माण होताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून मुंबईत भाजपकडून उत्तर भारतीयांचं हित जपण्याचं देखील प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
advertisement
अशात भाजपला मतदान केलं तर मुंबईचा महापौर कोण बनणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान, यावर आता भाजपचे मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं, तर मराठी माणूस मुंबईचा महापौर होईल का? हे भाजप सांगू शकतं का? असा प्रश्न विचारला असता शेलारांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यांनी मुंबईचा महापौर हिंदूच होईल अशी प्रतिक्रिया दिली.
"मुंबईचा महापौर हिंदूच होईल"
मराठी माणूस महापौर होईल का? असं थेट विचारलं असता "मराठी आणि हिंदू वेगवेगळं आहे का? परप्रांतीय वगैरेच्या भूमिकेला आम्ही मानत नाही. मुळात आमची भूमिका ही आहे की, मुंबई ही मराठी माणसांचीच आहे. मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर हिंदूच होईल," असं असं आशिष शेलारांनी म्हटलं. तुम्ही मराठी माणूस असं थेटपणे म्हणत नाही? असा प्रश्न केला असता, "का नाही म्हणणार... मराठी हिंदू एकच आहे... मराठी महापौर होईल," असं उत्तर शेलारांनी दिलं. 'बोल भिडू' युट्यूब चॅनेलशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
