पुणे : राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. मुंबई, ठाणे, पुण्यासह महत्त्वाच्या महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रभाग रचना जाहीर झाली असून निवडणुका जाहीर होण्याची प्रतिक्षा लागली आहे. मात्र, या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे भाकीत वर्तवले आहे. पुण्यातील एका मेळाव्यात बोलताना त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका येत्या जानेवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
राज्यातील अनेक नगरपरिषद, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. 2022 मध्ये या निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र 2022, 2023 आणि 2024 ही वर्षे उलटून गेली, तरीही निवडणुका झालेल्या नाहीत. आता 2025 चा उत्तरार्ध सुरु असूनही निवडणुका नेमक्या कधी होतील, याबाबत स्पष्टता नव्हती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, “निवडणुका लांबण्यामागील कारणांमध्ये मी सध्या जात नाही. मात्र आता निवडणुकांचे वारे सुरू झाले आहेत. जानेवारी महिन्यात या निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता आहे.”
त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण रंगू लागले आहे. निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निवड आणि प्रचार रणनीतीवरून चुरस वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्तांतराची चिन्हे दिसत असल्याने या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
> प्रभाग रचनांवरून वाद...
बहुमतांशी महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना त्यांनी स्वत:साठी अनुकूल मतदारसंघ तयार केल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे भाजपने आपल्याच मित्रपक्षांवर कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे. राज्यातील सत्ताधारी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व इच्छुकही अवस्थ आहेत. ही प्रभाग रचना केवळ भाजपच्याच फायद्याची झाली आहे असा या सर्व राजकीय पक्षांचा आरोप आहे.