महापालिका निवडणुकीत आधीच भाजपनं अजित पवारांना दूर लोटलं. त्यामुळे त्यांच्यावर एकटं लढण्याची वेळ आली. एकटं लढत असताना त्यांना महापालिकेत स्वत:ची ताकदही दाखवून देता आली नाही. ते पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून बसले. भाजपवर सडकून टीका केली. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करताना तर आपण पवारांची औलाद सांगणार नाही, असं मोठं वक्तव्य अजित पवारांनी केली. त्यांनी पिंपरी चिंचवडची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण एकेकाळी अजित पवारांच्या मुशीत तयार झालेल्या महेश लांडगे यांनीच वस्ताद अजित पवारांना अस्मान दाखवलं आहे.
advertisement
महापालिकेतील पराभवामुळे अजित पवार महायुतीच्या राजकारणात बॅकफुटला गेले आहेत. आगामी राजकारणात आपली ताकद टिकवून ठेवायची असेल, बार्गेनिंग पॉवर वाढवायची असेल, तर अजित पवारांना आता मरगळ झटकून मोठे निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांना राजकीय शाहणपणासोबत लोकांच्या भावनांनादेखील हात घालावा लागणार आहे. महापालिकेत बॅकफुटला गेलेल्या दादांना पुन्हा फ्रंटफुटला यायचं असेल तर काय करावं लागेल? त्यांच्यापुढे काय पर्याय असतील, कोणती आव्हानं असतील, याचीच माहिती घेऊयात...
जिल्हा परिषदेवर लक्ष केंद्रीत करावं लागेल
अजित पवारांसमोर पहिलं आव्हान असेल ते म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं. महानगरपालिकेत पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पुन्हा जोमाने उठून अजित पवारांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरावं लागेल. पूर्वीपासून अजित पवार आणि राष्ट्रवादीची ताकद ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त दिसून आली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजित पवारांना स्वत:ला झोकून द्यावं लागेल. ही निवडणूक अजित पवारांच्या नेतृत्वाची लिटमस टेस्ट ठरणार आहे. इथंही पराभव झाला, तर अजित पवारांचं राजकीयदृष्ट्या महत्त्व कमी होऊ शकतं.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र करावं लागेल
अजित पवारांसमोर दुसरं आव्हान असेल ते म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला एकत्र करण्याचं. राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे गट झाल्यापासून हा संपूर्ण पक्षात पक्षनेतृत्वाचा आणि ऐकीचा अभाव निर्माण झाला आहे. याच फुटीचा फायदा भाजपसह महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांना होत आहे. त्यामुळे लाँग टर्म पॉलिटीक्सचा विचार करून अजित पवारांना राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करावे लागतील. तसेच शरद पवारांचा वारसा म्हणून स्वत:ला प्रजेंट करावं लागेल. पक्षफुटीमुळे राष्ट्रवादीची जी व्होटबँक हलली आहे, याला पुन्हा जोडून घ्यावं लागेल.
भाजपशी जुळवून घ्यावं लागेल
अजित पवारांसमोर तिसरं महत्त्वाचं आव्हान असेल ते म्हणजे भाजपशी जुळवून घेण्याचं. महापालिका निवडणुकीत महायुतीतले तिन्ही वेगवेगळे लढले असले तरी शिंदेंनी मर्यादा सोडून भाजपवर टीका केली नाही. पण हे अजित पवारांच्या बाबतीत घडताना दिसलं नाही. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील संबंध ताणले गेले. यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी अजित पवारांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची देखील आठवण करून दिली. आधीच विचारांशी विसंगत असलेल्या भाजपसोबत अजित पवारांनी युती केली असताना, राज्यात आणि केंद्रात बहुमतात असलेल्या भाजपसोबतचं दुश्मनी अजित पवारांना परवडणारी नाही. त्यामुळे भाजपशी जुळवून घेणं, हाच अजित पवारांसाठी चांगला पर्याय असू शकतो.
पक्ष संघटना वाढवावी लागेल
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार एकटेच धावपळ करताना दिसले. राष्ट्रवादीचे इतर नेते प्रचारात कुठेही दिसले नाहीत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असे नेतेही कुठेच प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे अजित पवारांना पक्षसंघटनेत काही बदल करावे लागतील. नव्या दमाच्या नेत्यांना संधी द्यावी लागेल. पक्ष संघटन वाढवावं लागेत. तर अजित पवार पुढच्या राजकारणात तग धरू शकतात.
स्थानिक राजकारणाऐवजी राज्यात लक्ष घालावं
महापालिका निवडणुकीत प्रकर्षाने जाणवलेली एक बाब म्हणजे अजित पवारांनी महेश लांडगे यांच्यावर केलेली टीका. अजित पवार हे एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यात उपमुख्यमंत्री आहेत. मात्र तरीही त्यांनी भाजपच्या एका आमदारासोबत वाद घालण्यात आपला वेळ घालवला. ते केवळ पिंपरी चिंचवडमध्येच अडकून राहिले. त्यांना इतर महापालिकेत आपल्या पक्षाचा प्रचार करता आला नाही. आपल्या उमेदवारांना बळ देता आलं नाही. यामुळे अजित पवारांनी निवडणुकीच्या काळात असं एखादं दुसऱ्या ठिकाणी अडकून न राहता, संपूर्ण राज्यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.
