ज्यावेळी सुनेत्रा पवार अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्या तेव्हा त्यांचे हात थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. वहिनींची ही अवस्था पाहूण नणंद सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या. त्यांनी सुनेत्रा पवारांचा हात पकडून त्यांना स्टेजपर्यंत नेलं. यावेळी सुनेत्रा पवारांच्या सुनबाई ऋतुजा पवार देखील उपस्थित होत्या. तसेच कुटुंबातील इतर महिला देखील पाणावलेल्या डोळ्यांनी अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी आल्या होत्या.
advertisement
हा सगळा क्षण प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपला असून प्रसंग पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी शरद पवार देखील चिंतातूर अवस्थेत बसलेले दिसले. विशेष म्हणजे शरद पवारांची स्वत:ची प्रकृती नाजूक आहे. ते रुग्णालयात उपचार घेत होते. पण अजित पवारांच्या अपघाताची बातमी कळताच काल दुपारी ते हेलिकॉप्टरने बारामतीला रवाना झाले.
नेमका अपघात कसा झाला?
ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं.
दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसा, हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजुला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.
ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता. DGCA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील विमान तळ Table Top Runway प्रकारचं आहे. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडींग होईल असं वाटलं होतं. मात्र जमीनीपासून १०० फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहचण्याआधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि चार ते पाच स्फोट घडले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेनं धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही.
