बारामतीत लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी पवारांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. बारामतीत झालेल्या विमान अपघातामागील प्रमुख कारण खराब हवामान आणि कमी दृश्यमानता ही प्राथमिक कारणे समोर आले आहे. अपघातावेळी बारामतीमधील धावपट्टीच्या परिसरात दाट धुकं होतं. त्यामुळे दृश्यमानता जवळपास 800 मीटर इतकीच होती. या प्रतिकूल स्थितीत वैमानिकानं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला.
advertisement
विमान उतरवताना पायलटचा अंदाज चुकला
बारामती येथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला धावपट्टी दिसत आहे का, अशी विचारणा केली असता वैमानिकाने नकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर विमानाने हवेत गिरकी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात 'एटीसी' ने पुन्हा धावपट्टी दिसत आहे का, असे विचारले असता वैमानिकाने होकार दिला. त्यामुळे 'एटीसी'कडून लँडिंगची परवानगी देण्यात आली. यानंतर अपघात झाला. मात्र तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कॉकपिटमधून कोणाच्या तरी सूचनांनंतर दृश्यमानता कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला की नाही या दिशेने देखील तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी विमान उतरवताना पायलटचा अंदाज चुकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
बारामतीचे विमानतळ हे अनकंट्रोल्ड एअरफिल्ड आहे. सगळी विमाने इनस्ट्रुंमेंट फ्लाईट रुल्स किंवा व्हिज्युअल फ्लाइट रुलनुसार उड्डाण करतात. या नियमांनुसार बारामती विमानतळावरील तीन किलोमीटरची दृश्यमानता मानकांपेक्षा कमी आहे, असे पायलटकडून सांगण्यात आले आहे. या दृश्यमानतेमध्ये वैमानिकाने विमानतळावर विमान उतरवणे अपेक्षित नव्हते, असेही सांगण्यात येत आहे. ज्या विमानतळावर अद्ययावत यंत्रणा आहे, तिथे 550 मीटरची दृश्यमानताही पुरेशी असते. मात्र बारामतीमध्ये अद्ययावत यंत्रणा नव्हती, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणे आहे?
सकाळी पूर्वेला वाहन चालवताना डोळ्यांना सूर्यकिरणांचा त्रास होतो, असाच त्रास विमानातही होतो. यामुळे पूर्वेच्या दिशेने विमान उतरवण्याऐवजी पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेला पाहून का उतरवण्यात आले नाही, वाऱ्याची दिशा काय होती, हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विमान उतरवताना वारा नेहमी विमानाच्या शेपटीवर नव्हे, तर नाकावर असणे गरजेचे असते. अपघात होण्याआधी वैमानिकाने 'मे डे' कॉल दिला होता. यामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का, हे तपासायला हवे. विमान धावपट्टीवर उतरवताना विमान जवळपास 90 टक्के एका बाजूला झुकलेल्या स्थितीत होते. अशा स्थितीत विमानाची हवेत राहण्याची क्षमता कमी होते. वैमानिकाने हे का केले याचे कारण शोधणे गरजेचे आहे', असे मत हवाई वाहतूकतज्ज्ञ विंगकमांडर (निवृत्त) शशिकांत कोप्पीकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना नोंदवले आहे.
