नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशोक चव्हाण नांदेडमध्ये आले आहेत. भाजपने नांदेडची जागा गमावल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं, याबाबत अशोक चव्हाण यांना विचारलं असता, जाहिर वाच्याता करणं योग्य नाही. पराभवाची अनेक कारणं होती, तसंच ही निवडणूक राष्ट्रीय होती, विरोधकांनी अनेक गैरसमज पसरवल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच नांदेडच्या पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी विखे पाटील येणार आहेत, तेव्हा पराभवाबाबत चर्चा होईल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
advertisement
अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे माझा पराभव झाला असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, पण मी तसं बोललो नसल्याचा खुलासा चिखलीकर यांनी केला. यावरही अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली. चिखलीकर जर तसं बोललेच नाहीत तर बातम्या कशा येतात? असा सवाल अशोक चव्हाणांनी विचारला. बातम्या आणि वास्तव यात फरक आहे, आम्ही जिंकलो असतो तर स्तुतीसुमनं उधळली असती, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातूनही भाजपला जास्त लीड नाही. या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला फक्त 844 मतांची आघाडी मिळाली, त्यामुळे विधानसभेसाठी भाजपला भोकर मतदारसंघ धोक्याचा ठरू शकतो. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण इकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत, पण कमी लीड मिळाल्यामुळे अशोक चव्हाणंनी आतापासूनच भोकरमध्ये कामाला सुरूवात केली आहे. पक्षाच्या नेत्यांशी बोलून भोकरबाबत निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.
भाजपमध्ये येऊन चूक केली?
अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला पण इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं, आपला पक्ष बदलण्याचा निर्णय चुकला का? असं अशोक चव्हाणांना विचारलं असता, भाजपमध्ये जायचा माझा निर्णय वैयक्तिक होता, मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून मी निर्णय घेतला. एका निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय बदलणे हा पोरखेळ नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच आपण भाजपमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच मंत्रिपदाबाबतचा निर्णय मोदीजी घेतील, असंही अशोक चव्हाणांनी सांगितलं.
तो व्हिडिओ चुकीचा
संसदेत नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यांनंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागली, त्यात अशोक चव्हाणही होते. पण मोदींनी अशोक चव्हाणांकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ चुकीचा असून जे घडलंच नाही ते दाखवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप अशोक चव्हाणांनी केला. मी तिथे होतो, जे दाखवलं ते वास्तव नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.