माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने निवडणूक होणार आहे. संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, मतमोजणी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी व एनडीएमध्ये कडवी टक्कर होणार असल्याचे म्हटले जात आहे. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने क्ऱॉस वोटिंगचा धास्ती दोन्ही आघाड्यांना आहे. या निवडणुकीत विरोधकांची मते फोडून आपल्याकडे अधिक संख्याबळ असल्याचं दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न भाजप-एनडीएकडून करण्यात येणार आहे. तर, सत्ताधारी गटातील काही मते खेचून एनडीएला धक्का देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असणार आहे.
advertisement
कोणत्या पक्षांची मते फुटणार?
एनडीएकडून इंडिया आघाडीची मते फोडण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची मते फुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची काही मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्याशिवाय, आम आदमी पक्षाची देखील काही मते फुटण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील सत्ता गेल्यानंतर आम आदमी पक्षात सगळं काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. त्यातच पंजाबमध्येही पक्षातंर्गत कुरबुरी सुरू आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. त्यातूनच आता ठाकरेंची काही मते फुटणार असल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी आघाडीत प्रवेशण्यास उत्सुक असलेली खासदार मंडळी या निवडणुकीच्या निमित्ताने आपली निष्ठा कुठं आहे, हे दाखवणार असल्याची चर्चा आहे. सध्या लोकसभेत महाराष्ट्रातून इंडिया आघाडीकडे लोकसभेतील 30 खासदारांचे बळ आहे. त्यात काँग्रेसचे 13, ठाकरे गटाचे 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत.
11 खासदारांची माघार...
एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये नसणाऱ्या काही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांचे 11 खासदार आहेत. या दोन्ही पक्षांची माघार भाजपच्या फायद्यासाठी असणार असल्याचे म्हटले जात आहे.