नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला, यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा द्यायची तयारी दर्शवली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला मंत्रिमंडळातून मोकळं करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेतृत्वाला केली होती. यानंतर आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली.
या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, पियुष गोयल हे नेते उपस्थित होते.
advertisement
भाजपच्या या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती फडणवीस यांनी दिली. 'महाराष्ट्राच्या निकालावर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रात फक्त पॉईंट थ्री परसेंटचा फरक महायुती आणि महाविकासआघाडीच्या मतांमध्ये आहे. कुठे मतं मिळाली? कुठे मिळाली नाहीत. कुठे अडचणी आल्या, कोणत्या करेक्टिव्ह ऍक्शन घेतल्या पाहिजेत, यावर चर्चा झाली. विधानसभेच्या ब्लू प्रिंटवर चर्चा केली. केंद्रीय भाजप पूर्ण ताकदीने आमच्या मागे आहे', असं फडणवीस म्हणाले.
'येत्या विधानसभेचा रोडमॅप यावरही आम्ही प्राथमिक चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल. यासंदर्भातला रोडमॅप तयार केला आहे. लवकरच घटकपक्षांसोबत चर्चा करून, अत्यंत मजबुतीने निवडणुकीत कसं पुढे जाता येईल, यासंदर्भातली कारवाई आम्ही येत्या काळात करणार आहोत', असं फडणवीस यांनी सांगितलं.
फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय झाला? असा प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिलं. 'कोणताही बदल होणार नाही. पुन्हा एकदा एनडीएचं महायुतीचं सरकार मजबुतीने महाराष्ट्रात आणायचं आहे, कोणताही बदल होणार नाही', असं पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.