नाशिक : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही आणि मित्रपक्षांकडून यादी न आल्यानं हा निर्णय घेतल्याचं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जरांगे पाटलांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केलं. जरांगे यांनी जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो असं छगन भुजबळ म्हणाले.
advertisement
छगन भुजबळ यांनी जरांगेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि वक्तव्य केलं त्याचं स्वागत करतो. खरंतर देर आये दुरुस्त आये म्हणायला हरकत नाही. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एका समाजावर निवडणूक लढली जात नाही. सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करू शकतात. त्यांनी निवडणूक लढवायची ठरवलं तर इतर समाज साथ देत नाहीत.
मराठा समाजाचे जे बांधव आणि भगिनी मोकळेपणाने मतदान करतील. कोणतंही दडपण राहणार नाही. तसंही जर पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार उभा राहिले आहेत. त्यातले २० टक्के आऱक्षणातले आणि १५-२० टक्के इतर समजातले असतील. तर उरलेले ६० टक्क्यांपर्यंत उमेदवार हे मराठाच आहेत. त्यामुळे जरांगेंचा निर्णय चांगला आहे असं भुजबळांनी म्हटलं.
मित्र पक्षांची यादी न आल्यानं निर्णय घेतला असं म्हणतायत तर ठीक आहे. त्यांचा निर्णय आहे मी यात काय बोलणार? सर्व धर्मांचा पाठिंबा हवा आहे हाच अर्थ ध्वनित होतो. पक्ष जे असतात हा त्यांचा प्रयत्न असतो की सर्व समाजात धर्मात काम करणं, त्यातून निवडून येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आरक्षणाचं आंदोलन हा सामाजिक प्रश्न आहे तो वेगळा आहे. मी समता परिषदेचं काम करतो, ती ओबीसींसाठी काम करणारी संस्था आहे. आम्ही त्या संस्थेमार्फत निवडणूक लढवत नाही. निवडणूक लढण्यासाठी मतदारांचा विश्वास मिळवावा लागतो, काम करावं लागतं, पक्षानं काय काम केलं हे दाखवावं लागतं. महाराष्ट्रातल्या निवडणुका अधिक मोकळेपणाने लढवल्या जातील असं भुजबळ म्हणाले.
मनोज जरांगे यांनी सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली. काल त्यांनी बदला घ्यायचा असं म्हटलं होतं तर आज पत्रकार परिषद घेत थेट माघार घ्यायची घोषणा केली. यामुळे जरांगे भरकटले का असा प्रश्न भुजबळांना विचारला असता छगन भुजबळ यांनी मला यावर बोलायचं नाही असं म्हणत उत्तर देणं टाळलं.
