या अपघातात रईस शेख (रिक्षाचालक) आणि रुक्मिणी येणगे (वय 45) या प्रवाशाचा मृत्यू झाला. तर शीतल मोरे (वय २४) आणि पायल वरदे (वय 19) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रईस हाशिम शेख (वय 35, रा. रांजणगाव शेण) हे आपली रिक्षा घेऊन रेल्वे स्टेशन परिसरातून रांजणगाव शेणच्या दिशेने जात होते. मध्यरात्रीच्या अंधारात अहिल्यानगर रोडवरील गोळवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाचा अंदाज न आल्याने रिक्षा त्यावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला.
advertisement
नाशिकमध्ये दुचाकी चोरांचा धुमाकूळ, पंचवटीसह ही 3 ठिकाणे हॉटस्पॉट, धक्कादायक आकडेवारी समोर
घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रिक्षामध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी रिक्षाचा पत्रा कटरने कापावा लागला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपराज गंगावणे, संग्राम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या राबवले. या भीषण अपघातामुळे रांजणगाव शेण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






