प्रकल्पात राज्य सरकारकडून जमीन अधिग्रहणाची जबाबदारी घेतली जाणार असून, केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अधिग्रहणाला सुरुवात होणार आहे. या नव्या रेल्वेमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहरातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे, फास्ट शटल सेवेच्या माध्यमातून फक्त साडेचार तासांत पुणे गाठणे शक्य होणार आहे. यामुळे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि नोकरीच्या संधींसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा मोठा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
advertisement
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद अवघ्या दोन तासांत, काय म्हणाले रेल्वे मंत्री
या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी उद्योग आणि प्रवासी गरजांचा विचार करून, मध्य रेल्वे मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन या मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली असून, यामुळे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भाच्या रेल्वे संपर्कात मोठी गती येणार आहे.
पुण्यापर्यंतचा प्रवास आता अधिक सोपा आणि जलद
आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरहून पुणे गाठण्यासाठी प्रवाशांना मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर मार्गे तब्बल 421 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होते. यापुढे मात्र प्रत्यक्ष रस्तेमार्गाचे अंतर फक्त 230 किलोमीटरचे आहे. वाहतूक कोंडी आणि अपुरी रस्तेव्यवस्था यामुळे या मार्गानेसुद्धा 5 ते 8 तासांचा कालावधी लागत होता. तसेच, रेल्वेने प्रवास करताना मनमाड मार्गे तब्बल 9 तासांचा वेळ लागतो, जो अनेक प्रवाशांसाठी वेळखाऊ आणि थकवणारा ठरत होता. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हा नवीन प्रस्तावित रेल्वेमार्ग मंजूर झाल्यास, 159 किलोमीटरचा फेरा कमी होणार असून, पुण्यापर्यंतचे अंतर 250 किलोमीटरहूनही कमी होणार आहे.
मराठवाड्यासह खानदेश आणि विदर्भासाठी रेल्वे विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर ते अंकाई रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 2189 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे केवळ प्रवासाचा वेळच नव्हे, तर मालवाहतुकीतही मोठी सुलभता निर्माण होणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
याचदरम्यान, नवीन होणारा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल सध्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटसमोर अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि सध्या खासदार असलेले डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वैष्णव यांनीही या प्रस्तावित मार्गाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.






