मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. परंतु आद्रता जास्त असल्याने मुंबईमध्ये उकाडा जाणवणार आहे. त्याचबरोबर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुण्यामध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर सोलापूरमध्ये हिटवेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान कमी असणार असून 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे.
मराठवाड्यातही सूर्य आग ओकताना पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. तर 24 आणि 25 एप्रिल रोजी साठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश एवढे राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश शहरे ही प्रचंड प्रमाणात तापले आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती या शहरांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात नागरिकांनी हलके कपडे परिधान करावेत, भरपूर पाणी प्यावे व दुपारी 11 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.





