तिरुपती साईनगर शिर्डी ही ही एक्स्प्रेस 9 डिसेंबरला पहिल्यांदा धावली असून 14 डिसेंबरपासून नियमित सेवा सुरू होत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 4 वाजता तिरुपतीहून सुटणारी गाडी सोमवारी सकाळी 6.15 वाजता छत्रपती संभाजीनगरला आणि सकाळी 10.45 वाजता शिर्डीला पोहोचेल. परतीचा प्रवास सोमवारी सायंकाळी 7.35 वाजता सुरू होईल आणि संभाजीनगरमार्गे रात्री 11.10 वाजता पुढे तिरुपतीकडे रवाना होईल. दक्षिणेकडून येणाऱ्या भाविकांना एकाच दिवसात साईदर्शन करून परत जाण्याचीही सोय यामुळे उपलब्ध झाली आहे. मात्र, इतर भागातील प्रवाशांसाठी अशी सोय उपलब्ध नाही.
advertisement
विशेष गाड्यांच्या तीन फेऱ्या रद्द
संभाजीनगरकरांसाठी साप्ताहिक गाडी कायमस्वरूपी दिल्याचा लाभ मिळाला असला, तरी त्याच्या बदल्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या तिरुपती–शिर्डी विशेष गाड्यांच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 14, 21 आणि 28 डिसेंबरच्या विशेष सेवांना रद्द केल्यामुळे आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी प्रवासाची आखणी करूनही ट्रेन रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
तिरुपती-साईनगर शिर्डी या गाडीला छत्रपती संभाजीनगरसह एकूण 31 थांबे असतील. यामध्ये नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड हे महत्त्वाचे थांबे राहणार असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथला देखील ही गाडी थांबेल. विशेष म्हणजे नवीन एक्स्प्रेसचे डिझाइन दक्षिण भारतातील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. शिर्डी, मनमाड आणि नगरसोल येथे मोठा कोटा राखण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगरला केवळ 40 ते 45 जागा मिळतील अशी माहिती मिळते.
संभाजीनगरहून तिरुपतीकडे जाणारी गाडी उपलब्ध असली तरी, परतीचा मार्ग तितका सोयीस्कर नाही. भाविक शिर्डीला सकाळी 10 च्या सुमारास पोहोचतात; मात्र त्यांना परतीसाठी संध्याकाळी 7 वाजता उपलब्ध होणारी एकमेव गाडी पकडावी लागते. त्यामुळे वेळेचे बंधन आणि जागेची मर्यादा प्रवाशांसाठी अडचणीचे ठरणार आहे.






