उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून महापालिका निवडणुकीआधीच काँग्रेसनं टेन्शन वाढवलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला स्वत: हजर राहत आहेत. याशिवाय राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत.
advertisement
खरं तर, काही दिवस आधी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेसनं मुंबई स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस आपला निर्णय बदलेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं समोर आलं आहे. स्वत: रमेश चेन्नीथला यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
चेन्नीथला मुंबईत आले असता ठाकरे बंधूंना सोबत घेण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपण मुंबईत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमची मुंबईत निवडणुकीची सगळी तयारी झाली आहे. मी इथं एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आलो आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत, असंही चेन्नीथला यांनी सांगितलं.
काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे बंधूंची अडचण वाढली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस स्वबळावर लढली तर अल्पसंख्याक मतं दुरावण्याची भीती ठाकरेंना आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला काँग्रेसची प्रचंड मदत झाली होती. काँग्रेसची पारंपरिक मतं ठाकरे गटाला मिळाली होती. त्यामुळे ठाकरेंना मुंबईत सहा पैकी तीन जागा जिंकता आल्या होत्या. वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी हातून निसटली होती.
