सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
कुणी सोडून जात असतील तर त्यांची समजूत काढणे गरजेचे आहे आणि यासाठीच जे नाराज नेते पक्ष सोडायच्या तयारीत आहेत. त्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार, अशी भूमिका आज दत्तात्रय भरणे यांनी मांडली. पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी अद्याप पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलेले नाही. जे नाराज आहेत त्यांची कारणे ही छोटीशी किंवा गैरसमजातून पुढे आलेली असतील. मात्र आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
advertisement
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचा गट भारतीय जनता पक्षात पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
याच संदर्भात सर्वच इच्छुक प्रवेशकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषिमंत्र्यांनी आपण केवळ संवादासाठी आलो आहोत. डॅमेज कंट्रोलसाठी नाही, असा खुलासा केला. मात्र नाराजांची भेट घेऊन समजूत घालणार असे सांगताना हा सर्व प्रकार केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि पुढील गळती रोखण्यासाठी असल्याचे उघड झाले.