उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ 70 तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री वर्षा बंगल्यावर हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवावे, अशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
advertisement
अजित दादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी सहानुभूती आहे. तसेच, पवार कुटुंबातील सदस्याकडे नेतृत्व असल्यास पक्ष एकसंध राहण्यास मदत होईल, असा सूर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत आणि अजित दादांच्या अनुपस्थितीत त्या पक्षाचा चेहरा होऊ शकतात, असा विश्वास मुश्रीफ आणि मुंडे यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दुसरीकडे, पक्ष संघटनेवर पकड मजबूत करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार स्वतः अध्यक्ष होते, आता त्यांच्या निधनानंतर पटेलांसारखा अनुभवी चेहरा दिल्ली आणि राज्यातील राजकारण सांभाळण्यासाठी योग्य ठरेल, असे बोलले जात आहे.
अजित दादांच्या निधनामुळे रिक्त झालेले उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खाते कुणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा तर राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र त्याबाबत काय निर्णय होतो ते देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं या गोष्टी देखील महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
