धुळे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण गेले काही दिवस प्रचंड तापलेले दिसत आहे. गेल्या आठवड्याभरापासून विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, काही भागांत त्यांच्या समर्थकांमध्ये थेट हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. अशाच तणावपूर्ण वातावरणात मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी देवपूर परिसरात पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आणि शहरातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले.
advertisement
भारती पवार यांच्या विरोधात पत्रके
मतदानाच्या पूर्वसंध्येला दुपारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारती पवार यांच्या विरोधात बदनामीकारक आशयाची पत्रके वाटली जात असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली. ही बाब समजताच भाजपच्या समर्थकांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि पत्रके वाटणाऱ्या काही व्यक्तींना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला आणि दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
वाद तीव्र झाला
धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील देवपूर भागात ही पत्रके वाटली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामागे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यावर भाजपने थेट आरोप केले. विशेष म्हणजे, मनोज मोरे यांचे पुतणे तसेच उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या समर्थकांकडूनच ही पत्रके वाटली गेल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वाद अधिक तीव्र झाला.
या वादानंतर शिवसेनेचे नेते आणि आमदार गावित यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत भाजपच्या उमेदवाराविरोधात तक्रार दाखल केली. काही वेळातच भाजपनेही प्रत्युत्तर देत शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात बदनामीकारक पत्रके वाटल्याची अधिकृत तक्रार पोलिसांकडे नोंदवली. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे पोलिसांसमोरही गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली.
या घटनेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी देवपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या नेते, उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांना समज दिली. शांतता राखण्याचे आवाहन करत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवली.
मतदानावर परिणाम होणार?
मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनांचा मतदारांवर नेमका काय परिणाम होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तणावपूर्ण राजकीय वातावरणातही मतदार शांततेत आणि निर्भयपणे मतदान करतील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
