दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अलीकडेच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मला हलक्यात घेऊ नका, मी काय करतो, हे 2022 मध्ये दिसून आलं आहे. असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे. शिंदे यांचं हे वक्तव्य महाविकास आघाडीवर असल्याचं सांगितलं जात असलं तरी हा महायुतीतल्या घटक पक्षांना आणि भाजपाला इशारा समजला जात आहे. शिंदेंच्या वक्तव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदेंची री ओढली आहे. एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नये, ते जडच आहेत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर गुलाबराव पाटील यांनी देखील त्याच आशयाचं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर सांगितलं होते की मी माझ्यासोबत जे आले आहेत, त्यांना पुढच्या निवडणुकीत देखील पराभूत होऊ देणार नाही. अशा पद्धतीचे काम करून दाखवेल, असं एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साक्षीने सांगितले होते. तसेच आपण सर्वजण मिळून सरकार बनवू असं देखील ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांना कोणी हलक्यात घेऊ नये, ते जडच आहेत. शिंदे साहेबांना हलक्यात घेऊन कसे चालेल, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.
'मी धक्का पुरुष झालोय, त्यांना (शिंदे गटाला) एकदाच असा धक्का देईल की ते पुन्हा दिसणार नाहीत' या ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंसह संजय राऊतांवर टोलेबाजी केली आहे. "उद्धव ठाकरे यांनी फक्त संजय राऊत यांना धक्का द्यावा. मग त्यांना धक्का होण्याची गरज पडणार नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
