खरं तर डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात प्राणवी भोईर ही चिमुकली सुट्टीनिमित्त मावशी श्रृती ठाकूर हिच्याकडे राहावयास आली होती. यावेळी दोघेही रात्री गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला होता. ही घटना 28 सप्टेंबर 2025 ला घटना घडली होती.या घटनेनंतर दोघींना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर सामान्य रूग्णालयात उपचारासाठी त्याच दिवशी दाखल करण्यात आले होते.यावेळी अपघात विभागात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी दोघींनाही तपासले आणि ताबडतोब उपचार सुरू केले. दोन्ही रूग्णांना तात्काळ सर्पदंश विरोधी लस (Antisnake venoni) देण्यात आली. पण या दरम्यान प्राणवीला PICU मधील बाल रोग तज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता. तसेच प्रयोगशाळेत BT/CT इ. तपासण्या त्वरीत करण्यात आल्या. तरीही प्राणवी हीची तब्येत चिंताजनक वाटल्याने तीला तात्काळ सिव्हील हॉस्पीटल ठाणे येथे संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला. व ऑक्सीजन सपोर्टसह महापालिकेच्या रूग्णवाहिकेतून संदर्भित करण्यात आले.
advertisement
तसेच श्रृती ठाकूर यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्याची आवश्यकता वाटल्याने सिव्हील हॉस्पीटल ठाणे येथे संदर्भिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. व दोन्ही रूग्णांना शास्त्रीनगर सामान्य रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेमधून एकत्रीत संदर्भित करण्यात आले. तसेच सदर दोन्ही रूग्णांना वेळेवर व मार्गदर्शक सुचनांप्रमाणे उपचार करण्यात आले.
पण या दरम्यान प्राणवीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी 30 सप्टेंबरला श्रृती ठाकूर हिचा ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नातेवाईक प्रचंड आक्रामक झाले होते. रूग्णांच्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रूग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यामुळे दोन्ही रूग्णांचा मृत्यु झाल्याबाबत तक्रार केली होती. त्याअनुषंगाने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व इतर कर्मचारी आणि शास्त्रीनगर रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्याअनुषंगाने अहवाल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल यांनी 3 ऑक्टोबरला सादर केला होता.
अहवालामुळे डॉक्टरांच निलंबन
खरं तर या अहवालानूसार रूग्णालयाचे विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय जाधव यांची 27 सप्टेंबर रोजी नाईटड्यूटी होती. पण डॉ.संजय जाधव हे रूग्णालयात उपस्थित नव्हते.त्यामुळे डॉ. संजय जाधव यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली .महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांनी याबाबत पत्रक ही काढली आहे. त्यामुळे या कारवाईची चर्चा आहे.
