नेमकी घटना काय?
जळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ४६ नगरसेवक निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गट नोंदणीची अधिकृत प्रक्रिया नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेसाठी महाजन दाम्पत्यासह जळगावचे सर्व भाजप नगरसेवक नाशिकला गेले होते.
गट नोंदणीचे काम पूर्ण करून जळगावकडे परतत असताना, मालेगावनजीक मुंबई-आग्रा महामार्गावर त्यांच्या कारला अपघात झाला. महामार्गावरून जात असताना महाजन यांच्या कारच्या पुढे असलेल्या एका वाहनाने अचानक जोरात ब्रेक दाबला. वेग जास्त असल्याने मागून येणाऱ्या महाजन यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती कार समोरील वाहनावर जाऊन जोरदार धडकली.
advertisement
दोघेही थोडक्यात बचावले
या धडकेत कारच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारमध्ये महाजन दाम्पत्यासह एकूण पाच जण प्रवास करत होते. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. जयश्री महाजन, सुनील महाजन आणि इतर प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत.
