अजित पवार जेव्हा धुळे दौऱ्यावर यायचे, तेव्हा ते हमखास राजवर्धन कदमबांडे यांच्या घरी जेवायला थांबत असत. अशाच एका निवांत क्षणी त्यांनी राजवर्धन यांना प्रवासाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला होता. “सुरक्षिततेच्या दृष्टीने छोट्या विमानाने प्रवास टाळलेलाच बरा. मी स्वतःही शक्यतो असा प्रवास करत नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
मात्र नियतीचा खेळ किती विचित्र असतो, याचे हे दुर्दैवी उदाहरण ठरले. इतरांना सावध करणारे, धोका ओळखणारे आणि सुरक्षिततेवर भर देणारे अजित पवार अखेर त्याच छोट्या विमानाच्या प्रवासात आपल्यातून निघून गेले. ज्या संकटाची त्यांना भीती वाटत होती, त्याच संकटाने महाराष्ट्राच्या एका कणखर, अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाचा प्रवास अचानक थांबवला.
advertisement
आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्यावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्य सरकारकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती देताना सांगितले की, अजित पवारांचे पार्थिव सायंकाळी पावणेसात ते साडेआठ या वेळेत काटेवाडी येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर बारामतीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
“अजित पवार अमर रहे”,“परत या” च्या घोषणा
दरम्यान, बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात काल सकाळी नऊ वाजल्यापासूनच नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी गर्दी जमली होती. काल सकाळी ९.४५ वाजता अजित पवारांचे पार्थिव रुग्णालयात आणण्यात आले. त्या क्षणी परिसरात भावनांचा उद्रेक झाला आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देण्यास सुरुवात केली. “अजितदादा अमर रहे”, “अजित पवार अमर रहे”, “अजित पवार परत या, परत या” तसेच “एकच वादा, अजितदादा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि कार्यकर्त्यांचे दुःख या घोषणांतून स्पष्टपणे जाणवत होते.
